मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरांसह ठाणे जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून जोरदार पाऊस कोसळला. तसेच, सोमवारी सकाळीही तशीच परिस्थिती असल्याने, मध्य रेल्वेवरील लोकल सेवा कोलमडली.
सकाळच्यावेळी पावसामुळे दृश्यमानता कमी झाल्याने, लोकल सेवा उशिराने धावत होती. तर, सकाळी ९ वाजेच्या दरम्यान मस्जिद, भायखळा, दादर, माटुंगा, बदलापूर येथील रेल्वे रूळावर पाणी साचले. त्यामुळे लोकल सेवा कूर्मगतीने सुरू आहे. मस्जिद येथे रेल्वे रूळावर जास्त प्रमाणात पाणी साचल्याने, सीएसएमटी ते वडाळा रोड लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला.
रविवारी राज्यात पावसाचे आगमन झाले आहे अन् मुंबईमध्ये मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला. मुंबईसह उपनगरात रविवारी
सायंकाळपासूनच कोसळधारा पडण्यास सुरुवात झाली. सोमवारी पहाटे मुंबईत पावसाचा जोर वाढला. त्यामुळे सकाळच्या सुमारास कार्यालयात जाणाऱ्या नोकरदार वर्गाची तारांबळ उडाली.
हार्बर मार्गावरील लोकल सेवा कूर्मगतीने सुरू होती. त्यामुळे सीएसएमटी ते पनवेल प्रवास करताना प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागले. तर, सकाळी १०.२५ वाजता वडाळा रोड ते सीएसएमटी लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. तर, मध्य रेल्वेवरील मुख्य मार्गिका कूर्मगतीने धावत आहे. अप आणि डाऊन लोकल सेवा ३० ते ४० मिनिटे उशिराने धावत आहे. यासह लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवा अतिशय संथ गतीने पुढे सरकत आहेत.