मुंबई : शहरात बुधवारी काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या. शहराच्या तुलनेत उपनगरांत पावसाचा जोर अधिक होता. दरम्यान, गुरुवारी मुंबईसह ठाणे, पालघर भागात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मुंबईत मोसमी पाऊस दाखल झाल्यानंतर काही दिवसांतच पावसाने विश्रांती घेतली होती. त्यानंतर अधूनमधून हलक्या सरी बरसल्या. मुंबई शहर तसेच उपनगरात बुधवारी सकाळपासून पावसाने हजेरी लावली होती. अनेक भागात पावसाचा जोर होता. दादर, वरळी, भायखळा, परळ, पवई या भागांत हलक्या सरी बरसल्या तर बोरिवली, अंधेरी, वांद्रे, चेंबूर परिसरात पावसाचा जोर अधिक होता. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात बुधवारी १६ मिमी तर, सांताक्रूझ केंद्रात १०.८ मिमी पावसाची नोंद झाली.
पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन काहीसा दिलासा मिळाला. दरम्यान, मुंबईसह ठाणे, पालघर भागात गुरुवारी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या कालावधीत ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील.
राज्यात पुढील तीन दिवस कोकण, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मोसमी वाऱ्यांनी बुधवारीही वाटचाल केलेली नव्हती. मोसमी वाऱ्यांची सीमा मुंबई, अहिल्या नगर, आदिलाबाद, भवानीपटना, पुरी आणि बालूरघाट या भागातच होती.