मुंबई : मुंबईत शनिवारी सायंकाळी पावसाने दमदार हजेरी लावली होती. अनेक भागांत रात्रभर पाऊस पडत होता. मुंबईत आज पहाटेपासून पुन्हा पावसाने जोर धरला आहे. दरम्यान, मुंबईत रविवारीज दिवसभर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
यंदा लवकर दाखल झालेल्या पावसाने जूनच्या सुरुवातीपासून उघडीप दिली होती. त्यानंतर मुंबईत शनिवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. शहर तसेच उपनगरात मुसळधार पाऊस कोसळला. काही भागात रात्रभर पावसाची रिपरिप सुरू आहे. रविवारी पहाटेपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला असून दिवसभरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. दरम्यान, मुंबईत रविवारी मुसळधार पावसाचा, तसेच ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून, त्यापासून मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाड्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. कर्नाटक, तेलंगणा आणि रायलसीमा परिसरातही चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. अरबी समुद्रापासून ओडिशा किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. ही प्रणाली पूरक ठरत असल्याने राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील सर्व भागात पावसाचा जोर कायम असणार आहे.
आज पावसाचा इशारा कुठे
अतिवृष्टीचा इशारा (रेड अलर्ट)
रत्नागिरी
अतिमुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट)
ठाणे, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर</p>
मुसळधार पावसाचा इशारा (यलो अलर्ट)
मुंबई, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर
पालिकेच्या स्वयंचलित केंद्रावर शनिवारी सकाळी ८ ते रविवारी सकाळी ८ पर्यंत झालेली पावसाची नोंद
मुंबई शहर – ३१ मिमी
पूर्व उपनगर – २१ मिमी
पश्चिम उपनगर- २० मिमी
नैऋत्य मोसमी वारे जैसे थे
मुंबई, अहिल्यानगर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांच्या काही भागात दाखल झाल्यानंतर नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची वाटचाल मंदावली आहे. मोसमी वाऱ्यांनी २० दिवसांपासून वाटचाल केलेली नाही. मोसमी वाऱ्यांची सीमा शनिवारीही कायम होती. दरम्यान, मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण निर्माण होत असल्याने दोन ते तीन दिवसांत विदर्भासह, छत्तीसगड आणि ओडिशामधील काही भागासह पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहार, तसेच गुजरातमध्ये मोसमी वाऱ्यांची प्रगती होण्याची शक्यता आहे.