मुंबई : ‘बाबा आता मला तुमची सेवा करायची आहे’, अशी इच्छा अहमदाबाद येथे अपघातग्रस्त विमानाचे वैमानिक सुमीत सभरवाल यांनी तीन दिवसांपूर्वी वडिल पुष्पराज सभरवाल यांच्याशी मोबाइलवर संवाद साधताना व्यक्त केली होती. मात्र एअर इंडियाच्या अहमदाबाद – लंडन गॅटविक विमानचा अहमदाबाद विमानतळाजवळच अपघात झाला आणि या विमानाचे सारथ्य करणारे सुमीत सभरवाल यांचा त्यात मृत्यू झाला. त्यामुळे वडिलांची सेवा करण्याची त्यांची इच्छा अपुरी राहिली.
सुमीत १९९४ पासून वैमानिक म्हणून काम करीत होते. ते एअर इंडियामध्ये लाइन ट्रेनिंग कॅप्टन (एलटीसी) पदावर कार्यरत होते. सुमीत यांना आठ हजार २०० तासांहून अधिक तास विमान उड्डाणाचा अनुभव होता. ते अनुभवी व उच्च प्रशिक्षित वैमानिक होते. यापूर्वी त्यांच्यावर इतर वैमानिकांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. ते पवई परिसरात वास्तव्यास होते. आतापर्यंत एकही अपघात न केलेले सुमीत हे स्वतः उत्तम वैमानिक होते. त्यांनी अनेक वैमानिकांना प्रशिक्षणही दिले होते. त्यांच्या बहिणीची दोन मुलगीही वैमानिक पदावर कार्यरत आहेत. तीन दिवसांपूर्वी सुमीत यांचे वडिल पुष्पराज सभरवाल यांच्यासोबत फोनवर बोलणे झाले होते. ‘बाबा, आता सर्व सोडून तुमची सेवा करायची आहे’, असे त्यांनी वडिलांना सांगितले होते. पण ही त्यांची इच्छा अपुरी राहिली.
सुमीत यांच्या पश्चात ८८ वर्षांचे वडील व बहिण असा परिवार आहे. त्यांचे दोन भाचेही वैमानिक असून तेही सध्या प्रतिष्ठीत विमान कंपनीत कामाला आहेत. त्यांच्या आईचे करोनाकाळात निधन झाले होते. ते वडिलांसोबत पवई येथील जलवायू हिरानंदानी इमारतीच्या सातव्या मजल्यावर राहत होते. दरम्यान, सुमीत यांच्यासोबत कार्यारत फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर यांना सुमारे एक हजार १०० तासांहून अधिक काळ विमान उड्डाणाचा अनुभव होता आणि ते व्यावसायिक विमान वाहतुकीत तुलनेने नवीन होते, मात्र बोईंग ७८७ ड्रीमलाईनर चालवण्यासाठी ते पूर्णपणे प्रशिक्षित होते, असे एअर इंडियाकडून सांगण्यात आले आहे.
या विमानाने अहमदाबाद विमानतळावरील धावपट्टी २३ वरून दुपारी अंदाजे १.३९ च्या सुमारास उड्डाण केले. उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच कॅप्टन सभरवाल यांनी ‘मेडे’ संदेश प्रसारित केला. हे आपत्कालीन संकेत आहेत. विमान उड्डाणादरम्यान जीवघेणी तांत्रिक अडचण किंवा आपत्तीची स्थिती असते त्यावेळी वैमानिकाकडून हा संदेश देण्यात येतो. सुमीत यांनी तीन वेळा ‘मेडे’ संदेश दिला होता. पण त्यानंतर काही सेकंदातच विमानाचा संपर्क तुटला आणि काही मिनिटांतच विमान निवासी भागात कोसळले. ही दुर्घटना भारतातील पहिली बोईंग ७८७ ड्रीमलाइनरची दुर्घटना आहे.