मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेमध्ये मंजुरी मिळूनही कल्याण येथील उपकेंद्राला आनंद दिघे यांचे नाव देण्यात आलेले नाही. सदर उपकेंद्राला आनंद दिघे यांचे नाव न दिल्यास आम्हीच नामकरण सोहळा करू, असा इशारा शिवसेनेच्या (ठाकरे) युवासेनेने दिला होता. या अनुषंगाने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून शिवसेनेच्या (ठाकरे) युवा सेनेने कल्याण उपकेंद्राच्या भिंतीवर ‘धर्मवीर आनंद दिघे – मुंबई विद्यापीठ कल्याण उपकेंद्र’ असा नामफलकच झळकावला. याप्रसंगी ‘धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा विजय असो’ या घोषणा देत अधिसभा सदस्यांनी परिसर दणाणून सोडला होता.

ठाणे जिल्हा हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाचा बालेकिल्ला मानला जातो. तसेच दिवंगत आनंद दिघे हे शिवसेनेचा (शिंदे) जिव्हाळ्याचा विषय आहे. याच ठाणे जिल्ह्यातील कल्याण उपकेंद्राला आनंद दिघे यांचे नाव देण्यास दिरंगाई होत असताना हे नामकरण करण्यासाठी शिवसेनेने (ठाकरे) मुंबई विद्यापीठाकडे आग्रह धरला.

मात्र मुंबई विद्यापीठाने दुर्लक्ष केल्यामुळे शिवसेनेच्या (ठाकरे) युवा सेनेने कल्याण उपकेंद्राच्या भिंतीवर ‘धर्मवीर आनंद दिघे – मुंबई विद्यापीठ कल्याण उपकेंद्र’ असा नामफलक झळकावत एकनाथ शिंदे यांना थेट ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये काटशह दिला आहे, आत या नामकरण सोहळ्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या नामकरण सोहळ्याप्रसंगी अधिसभा सदस्य शितल शेठ – देवरुखकर, प्रदीप सावंत, अल्पेश भोईर, परमात्मा यादव, मिलिंद साटम, धनराज कोहचडे, किसन सावंत आणि माजी अधिसभा सदस्य राजन कोळंबेकर आदी उपस्थित होते.

ठाणे आणि पुढील क्षेत्रातील विद्यार्थ्यांना सोयीचे व्हावे म्हणून ठाणे जिल्ह्यात मुंबई विद्यापीठाची ठाणे आणि कल्याण येथे उपकेंद्रे सुरू झाली. या उपकेंद्रांना शिवसेनेचे दिवंगत माजी ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे नाव देण्याचा ठराव मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत २०१८-१९ मध्ये मंजूर झाला होता.

दोन वर्षांपूर्वी ठाणे उपकेंद्राला आनंद दिघे यांचे नाव देण्यात आले, मात्र कल्याण उपकेंद्राचे अद्यापही नामकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे शिवसेनेच्या (ठाकरे) युवा सेनेच्या अधिसभा सदस्यांनी कल्याण उपकेंद्राचे ‘धर्मवीर आनंद दिघे – मुंबई विद्यापीठ कल्याण उपकेंद्र’ असे नामकरण करण्यास दोन दिवसांची मुदत दिली होती.

या मागणीकडे मुंबई विद्यापीठ प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून शिवसेनेच्या (ठाकरे) युवा सेनेने कल्याण उपकेंद्राच्या भिंतीवर ‘धर्मवीर आनंद दिघे – मुंबई विद्यापीठ कल्याण उपकेंद्र’ असा नामफलकच लावून नामकरण सोहळा करून घेतला आहे.

‘ठाणे व कल्याण या दोन्ही उपकेंद्रांना धर्मवीर आनंद दिघे असे नाव देण्याचा ठराव व्यवस्थापन परिषदेत मंजूर झाला होता. मात्र त्यानंतर मुंबई विद्यापीठ प्रशासनाने उदासीनता दाखविली. आम्ही आग्रह धरल्यामुळे दोन वर्षांपूर्वी ठाणे उपकेंद्राला आनंद दिघे यांचे नाव देण्यात आले, पण कल्याण उपकेंद्राला नाव देण्याचा विसर पडला. त्यामुळे हे नामकरण तात्काळ करण्याची मागणी मुंबई विद्यापीठ प्रशासनाकडे केली, मात्र पुन्हा विद्यापीठ प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर कल्याण उपकेंद्र येथे ‘धर्मवीर आनंद दिघे – मुंबई विद्यापीठ कल्याण उपकेंद्र’ असा नामफलक लावला.

तसेच अलिकडेच झालेल्या अधिसभेच्या बैठकीत ठाणे व कल्याण उपकेंद्राचे शासनामार्फत सुशोभिकरण करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र विद्यापीठ प्रशासनाला नामकरणाचा विसर पडला असून सुशोभिकरणही दूर राहिले आहे. कल्याण उपकेंद्राची दूरवस्था कायम आहे’, असे शिवसेनेच्या (ठाकरे) युवा सेनेचे अधिसभा सदस्य प्रदीप सावंत यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कल्याण उपकेंद्राची दूरवस्था

कल्याण उपकेंद्र २०१४ साली स्थापन करण्यात आले. मात्र जवळपास दहा वर्षे लोटल्यानंतरही कल्याण उपकेंद्रात आवश्यक सुविधांचा अभाव असल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून वारंवार करण्यात येत आहे. तेथे पूर्णवेळ केंद्र संचालक नाही. एकच स्वच्छता कामगार आहे. अस्वच्छता व धुळीचे साम्राज्य पसरले आहे. प्रत्यक्ष तासिका होत नाहीत. मोठे ग्रंथालय असूनही कमी पुस्तके, अस्वच्छ प्रसाधनगृहे, पिण्याच्या पाण्याचा तुटवडा, आग प्रतिबंध व्यवस्थेचा अभाव, मिळत नसलेले आयडॉलचे अध्ययन साहित्य, अनेक खिडक्यांची तुटलेली तावदाने आदी कल्याण उपकेंद्रातील विविध समस्यांवर युवा सेनेने प्रकाशझोत टाकला होता. तसेच या सर्व समस्या तात्काळ दूर करण्याची मागणीही केली. मात्र अद्यापही कल्याण उपकेंद्राची दूरवस्था कायम असल्याचा दावा युवा सेनेने केला आहे.