मुंबई : प्रशासकीय कामकाजात नेहमी व्यग्र असणाऱ्या महिला अधिकाऱ्यांनी शुक्रवारी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आपल्यातल्या संवेदनशीलतेची ओळख करून दिली. दक्षिण मुंबईतील एनसीपीएच्या प्रांगणात आयोजित काव्यवाचनातून स्त्रीमन आणि संवेदनशीलतेचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. राज्य शासनाच्या विविध विभागांतील उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्यांनी विविध भाषांमधील कवितांमधून स्त्री मनाचे विविध पैलू उलगडले.

‘मरो प्रपंचम मरो प्रपंचम’ ही तेलगू कविता, लडाखी भाषेतील ‘स्पामो’, पंजाबी भाषेतील ‘अज अखा वारीस शाह नू’ किंवा मराठीतील ‘किती बंडखोरी वसे आत माझ्या’ या कवितांमधून या अधिकाऱ्यांनी महिलांच्या संघर्षाची, त्यांच्यातल्या ताकदीची आणि त्यांना खुणावणाऱ्या नव्या क्षितीजांची कहाणी मांडली.नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सतर्फे ‘चौराह’ या बहुभाषिक काव्य मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, आर्थिक महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक मनीषा वर्मा, सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या प्रधान सचिव इडजेस कुंदन, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टच्या संचालक निधी चौधरी यांनी या कार्यक्रमात स्वरचित व इतर सुप्रसिद्ध कवींच्या कविता सादर केल्या. पंजाबी, तेलगू, मराठी, हिंदी, लडाखी अशा विविध भाषांमधील या कवितांचा एकच धागा होता तो म्हणजे स्त्रीमन…अतिशय चोखंदळपणे निवडलेल्या या कवितांमुळे हा काव्यवाचनाचा कार्यक्रम एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला.

एनसीपीएच्या पहिल्या महिला संचालिका ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांनी तीन दशकांपूर्वी चौराह हा उपक्रम सुरू केला होता. या उपक्रमात मधल्या काळात खंड पडला होता. कलाकृतींना व्यासपीठ देणारा हा उपक्रम नव्याने सुरू करण्याच्या उद्देशाने एनसीपीएने या अनोख्या काव्यवाचनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला विजया मेहता यांची कन्या अनाहिता ओबेरॉय उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला राज्य सरकारच्या विविध विभागांतील अधिकारी, लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, माजी संपादक कुमार केतकर, एनसीपीएच्या वृंदा खटाव आदी उपस्थित होते. निधी चौधरी यांनी स्वरचित कवितेद्वारे मारवाड प्रांतातील गावातील तेव्हाचा चौराह (चौक) आणि आता बदललेले गाव, डोक्यावरून पदर ओढणाऱ्या स्त्रिया आणि आताच्या प्रश्न उपस्थित करणाऱ्या स्त्रिया यांची ओळख करून दिली. एनसीपीएच्या प्रांगणात काव्यवाचनातून स्त्रीमन आणि संवेदनशीलतेचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला.

‘मरो प्रपंचम’मधून आव्हानांचा धांडोळा

मेट्रो वुमन म्हणून प्रसिद्ध असलेल्या अश्विनी भिडे यांनी ममता सिंधुताई सपकाळ यांची ‘किती बंडखोरी वसे आत माझ्या’ ही कविता म्हटली. तर व्ही. राधा यांनी तेलगू भाषेत ‘मरो प्रपंचम’ या कवितेतून महिलांना खुणावणाऱ्या नवनव्या आव्हानांची आठवण करून दिली. व्ही. राधा यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात स्त्री म्हणून साशंकपणे पाहणाऱ्या वरिष्ठांचा किस्सा सांगितला, तर आठव्या वर्षी लग्न झालेल्या आजीला कसे त्याकाळी शिक्षण घेता आले नाही याची खंत व्यक्त केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सरकारी कामकाजावर व्यंगात्मक कविता

‘अहवाल पाठवा अहवाल पाठवा’ या सरकारी कामकाजावरील व्यंग करणाऱ्या कवितेने उपस्थितांची दाद मिळवली. इडजेस कुंदन यांनी लडाखी भाषेत स्त्रीच्या ताकदीचा गौरव करणारी कविता दाद देऊन गेली. मनीषा वर्मा यांनी यावेळी स्वरचित तर काही इतर सुप्रसिद्ध कवींच्या कविता म्हटल्या.