मुंबई : भारतीय औषधनिर्माणशास्त्र परिषदेने (पीसीआय) पायाभूत सुविधा नसल्याने ८९ महाविद्यालयांमधील २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्षाचे प्रवेश रोखण्याचे आदेश दिले होते. मात्र यापैकी ३८ महाविद्यालयांनी निकषांच्या पूर्ततेसंदर्भातील प्रतिज्ञापत्र सादर केल्याने त्यांच्यावरील प्रवेश बंदी उठवण्यात आली आहे. यामध्ये पदवी अभ्यासक्रमाचे १३, तर पदविका अभ्यासक्रमाच्या २५ महाविद्यालयांचा समावेश आहे. प्रवेश बंदी उठविल्याने या महाविद्यालयांचा प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीतील मार्ग मोकळा झाला आहे.
करोना काळातपीसीआयकडून परवानगी दिलेल्या राज्यातील पदविकाच्या २२० आणि पदवीच्या ९२ नव्या औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयांमध्ये शिक्षणासाठी आवश्यक पायाभूत सुविधा नसल्याचे उघड झाले होते. त्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने तंत्रशिक्षण संचालनालय आणि तंत्रशिक्षण मंडळाने या संस्थांची तपासणी केली असता पदवी अभ्यासक्रमाच्या ४८, तर पदविका अभ्यासक्रमाची १२८ महाविद्यालये पीसीआयच्या निकषांचे पालन करीत नसल्याचे आढळले. त्यामुळे तंत्रशिक्षण संचालनालयाने या १७६ महाविद्यालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवण्यात आली. या नोटीसीला समाधानकारक उत्तर न देणाऱ्या ८९ महाविद्यालयांवर कारवाईचा बडगा उगारून २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्षाचे प्रवेश थांबविण्याचे आदेश पीसीआयने दिले होते. यामध्ये पदवीच्या १८ आणि पदविकाच्या ७१ महाविद्यालयांचा समावेश होता.
प्रथम वर्षाचे प्रवेश बंद केलेल्या महाविद्यालयांनी निकष पूर्ण करण्यासंदर्भातील प्रतिज्ञापत्र सादर केले, तर काही महाविद्यालयांनी निकषांची पूर्तता केल्याचा अहवाल पीसीआयला सादर केला. त्यानंतर पीसीआयने पदवीच्या १३, तर पदविकाच्या २५ महाविद्यालयांमधील प्रथम वर्षाचे प्रवेश सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे पदवी अभ्यासक्रमाच्या जवळपास ८००, तर पदविका अभ्यासक्रमाच्या १५०० जागा वाढण्याची शक्यता आहे. प्रवेश बंदी उठविण्यात आलेल्या या महाविद्यालयांचा समावेश दुसऱ्या फेरीमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे या महाविद्यालयांचा प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. दुसऱ्या फेरीमध्ये वाढणाऱ्या जागांमुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे. तसेच उर्वरित महाविद्यालयांबाबतही पीसीआयकडून लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण विभागातील एका अधिकाऱ्याने दिली.
प्रवेश बंदी उठविण्यात आलेली पदवी महाविद्यालये
वाशिममधील माऊली इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, लातूरमधील जय भारत कॉलेज ऑफ फार्मसी, महाडमधील एसबीएनएम कॉलेज ऑफ फार्मसी, पालघरमधील एल्डेल कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्च, ठाण्यातील ज्ञान गंगा कॉलेज ऑफ फार्मसी, नागपूरमधील नॅशनल कॉलेज ऑफ फार्मसी, चंद्रपूरमधील चंद्रपूर कॉलेज ऑफ फार्मसी, प्रभात इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, नाशिकमधील ब्रह्मा व्हॅली इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, अहिल्यानगरमधील कै. देवराव दिगंबर वरात कॉलेज ऑफ फार्मसी, सातारा येथील मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाचे कॉलेज ऑफ फार्मसी, पुण्यातील एकनाथ सीताराम दिवेकर कॉलेज ऑफ फार्मसी, कोल्हापूरमधील बाळासाहेब देसाई कॉलेज ऑफ फार्मसी यांचा समावेश आहे.