मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा धरणात २० मेगावॉट क्षमतेचा जलविद्युत, तर ८० मेगावॉट क्षमतेचा तरंगता सौरऊर्जा असा एकूण १०० मेगावॉट क्षमतेचा संकरित वीजनिर्मिती प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी राज्य शासनाने ४.९० हेक्टर राखीव वनजमीन पुनर्वळतीकरणास परवानगी दिली आहे. यामुळे आता संकरित वीजनिर्मिती प्रकल्पाच्या प्रत्यक्ष बांधकामास सुरूवात करण्यात येणार आहे. संकरित ऊर्जानिर्मिती क्षेत्रात पाऊल टाकणारी महानगरपालिका ही देशातील पहिलीच महानगरपालिका ठरली आहे.

महानगरपालिका आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करून प्रशासनाने ही परवानगी मिळवली आहे. या प्रकल्पातून दरवर्षी सुमारे २०८ दशलक्ष युनिट ऊर्जानिर्मिती होणार आहे. हा प्रकल्प केवळ मुंबईसाठी नव्हे, तर संपूर्ण देशासाठी हरित ऊर्जेच्या दिशेने एक प्रेरणादायी पाऊल ठरणार आहे. या प्रकल्पाबरोबरच भविष्यात महानगरपालिकेच्या अन्य जलाशयांवर सौरऊर्जा प्रकल्प विकसित करणे शक्य होईल. महानगरपालिकेने पालघर जिल्ह्यात मोखाडा तालुक्यातील कोचाळे गावात १०२.४ मीटर उंचीचे आणि ५६५ मीटर लांबीचे मध्य वैतरणा धरण बांधून २०१४ मध्ये पूर्ण केले. या धरणाचे ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय’ असे नामकरण करण्यात आले आहे. या धरणाच्या निर्मितीच्या वेळीच जलविद्युत प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने पाणीपुरवठा, तसेच जलविद्युत निर्मितीसाठी संयुक्तिक बहिर्गामी जलवाहिनीही टाकण्यात आली होती.

राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने या जलाशयातून जलविद्युत निर्मिती करण्यासाठी १२ डिसेंबर २०१९ रोजी मुंबई महानगरपालिकेस परवानगी दिली. त्यानंतर महानगरपालिकेने सल्लागारांची नियुक्ती केली. मोठ्या स्वरूपाची विजेची मागणी पाहता ‘संरचना, बांधा, वित्तपुरवठा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर जलविद्युत निर्मितीच्या बरोबरीने सौरऊर्जा निर्मिती करणे अधिक फायदेशीर ठरेल, असे सल्लागारांनी सुचविले. ही शिफारस स्वीकारून महानगरपालिकेने ‘कॅप्टिव्ह पॉवर प्रोड्युसर मॉडेल’नुसार या प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी निविदा मागवल्या.

या प्रकल्पाचा कालावधी हा ३१ महिने एवढा आहे. त्यातील वित्तीय परिनिश्चिती कालावधी ७ महिने आहे. प्रत्यक्ष बांधकाम कालावधी पावसाळा वगळून २४ महिने आहे. त्यानुसार १ जून २०२२ पासून वित्तीय परिनिश्चितीचा कालावधी सुरू झाला आहे. या प्रकल्पाचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे प्रकल्पासाठी महानगरपालिकेकडून कोणतीही भांडवली गुंतवणूक केली जाणार नाही. महानगरपालिका २५ वर्षांच्या कालावधीसाठी केवळ ४.७५ रुपये प्रति युनिट या दराने वापरलेल्या युनिटसाठी पैसे देणार आहे.

पिसे-पांजरापूर जलशुद्धीकरण संकुलातील विजेची बचत

या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात २० मेगावॅट जलविद्युत प्रकल्प आणि ६.५ मेगावॅट तरंगता सौर ऊर्जा प्रकल्पाला मान्यता दिली आहे. पहिल्या टप्प्यातून दरवर्षी अंदाजे ७८.१३ दशलक्ष युनिट्स वीज निर्मिती होईल. यामुळे पिसे-पांजरापूर स्थित महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण संकुल येथील वीज खर्चात दरवर्षी अंदाजे १२ कोटी ६ लाख रुपयांची बचत होईल असा अंदाज आहे. या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज मुक्त प्रवेश धोरणानुसार महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेडच्या विद्यमान ग्रीड नेटवर्कमार्फत वहन केली जाईल. यासाठी मध्य वैतरणा धरणापासून नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीजवळील महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेडच्या विद्यमान ग्रीडपर्यंत १३ किलोमीटर लांबीची स्वतंत्र ट्रान्समिशन लाईन उभारण्यात येईल.

वनजमीन पुनर्वळतीकरणास परवानगी

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने २१ जुलै रोजी वन (संरक्षण व संवर्धन) अधिनियम, १९८० च्या कलम २ अंतर्गत ४.९० हेक्टर राखीव वनजमिनीच्या पुनर्वळतीकरणास परवानगी दिली आहे. या प्रकल्पाच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. या परवानगीमुळे पालघर जिल्ह्यातील हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशयावर संकरीत ऊर्जा प्रकल्पाच्या प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात होऊ शकणार आहे. महानगरपालिकेने ही परवानगी केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाशी सातत्याने समन्वय साधून मिळवलेली आहे. केंद्रीय मंत्रालयाने यापूर्वी ९ ऑक्टोबर २०२४ रोजी ‘प्राथमिक’ मंजुरी व त्यानंतर ७ एप्रिल २०२५ रोजी ‘अंतिम’ मंजुरी दिली होती.