लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : विधानसभा निवडणुकीत कराड दक्षिण मतदारसंघातून विजयी झालेले भाजप उमेदवार अतुल भोसले यांच्या आमदारकीला काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उच्च न्यायालयात दिले आहे. त्यांनी या प्रकरणी निवडणूक याचिका दाखल केली असून त्यावर २४ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. चव्हाण यांचा भोसले यांच्याकडून ४० हजार मतांनी पराभव झाला होता.

या मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन झाले. तसेच, मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आल्याचा आरोप करून भोसले यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी चव्हाण यांनी याचिकेद्वारे केली आहे. भारतीय लोकशाही ही मुक्त आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेमुळे टिकून आहे. परंतु, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत विविध पातळीवर अनियमितता आढळून आली, असा दावाही चव्हाण यांनी केला आहे. मतदानयंत्राबाबत चव्हाण यांनी याचिकेत प्रामुख्याने प्रश्न उपस्थित केला आहे.

आणखी वाचा-मुंबई : मरीन ड्राईव्ह येथील पंचतारांकीत हॉटेलमध्ये महिलेचा मृतदेह सापडला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निवडणूक काळात विरोधी पक्षाच्या उमेदवाराच्या समर्थकांकडून झालेल्या गैरव्यवहाराचे मुद्दे निवडणूक आयोगाकडे अनेकवेळा उपस्थित केले. तथापि, या मुद्द्यांची योग्य पडताळणी केली गेली नाही किंवा ते गांभीर्याने घेतले गेले नाहीत. परिणामी, निवडणूक प्रक्रिया मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात झाली नाही, असा दावाही चव्हाण यांनी याचिकेत केला आहे.