मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. प्रामुख्याने कोकणात पावसाचा जोर सर्वाधिक आहे. रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून संततधार पाऊस कोसळत आहे. रायगड जिल्ह्यात मंगळवारी सकाळपर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. काही भागात १०० मिमीपेक्षा अधिक पाऊस नोंदला गेला. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस या भागात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
कोकणातील सर्व जिल्ह्यांत सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत. जिल्ह्यातील अनेक भागात गेल्या २४ तासांत मुसळधार पाऊस कोसळला. जिल्ह्यात सोमवारी सकाळी ८:३० ते मंगळवारी सकाळी ८:३० वाजेपर्यंत या २४ तासांत पनवेल येथे १०२.६ मिमी, खालापूर १६८ मिमी, माथेरान १६५.४ मिमी, सुधागड १३६ मिमी, पोलादपूर १३५ मिमी, पेण १०४ मिमी आणि रोहा येथे १४८ मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पावसाची नोंद खालापूर येथे झाली आहे. या कालावधीत रायगड जिल्हायात एकूण १५४३ मिमी (९६ टक्के) पावसाची नोंद झाली. याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यात १०५ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग येथे १२९ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदी आणि पाताळगंगा नदीने मंगळवारी सकाळी १० वाजता इशारा पातळी ओलांडली होती. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस रायगडसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मध्य महाराष्ट्रात या कालावधीत हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र, घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक राहणार आहे. त्याचबरोबर विदर्भातही गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे. मुंबईतही मंगळवारी पहाटे काही भागात पाऊस पडत होता. त्यानंतर मात्र दिवसभर मुसळधार पाऊस झालेला नाही. काही भागांत अधूनमधून हलक्या सरींनी हजेरी लावली.
दरम्यान, मोसमी वारे मंगळवारी आणखी काहीसे पुढे सरकले. उत्तर अरबी समुद्राचा आणि हिमाचल प्रदेश, पश्चिम उत्तर प्रदेशचा काही भाग, हरियाणाचा आणखी काही भाग तसेच चंदीगडचा काही भाग व्यापला आहे. मोसमी वाऱ्यांची सीमा मंगळवारी बारमेर, जोधपूर, जयपूर, आग्रा, बिजनोर, रामपूर या भागात होती. पुढील दोन दिवसांत मोसमी वारे आणखी काही भागात वाटचाल करतील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.