मुंबई : विलेपार्ले येथील प्रसिध्द साठ्ये महाविद्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून २१ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली. संध्या पाठक असे तिचे नाव आहे. गुरूवारी सकाळी ७.१५ च्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, माझ्या मुलीने आत्महत्या केली नसून तिला कुणी तरी वरून ढकल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप वडिलांनी केला आहे. याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी अपमृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.
नालासोपारा येथे राहणारी संध्या पाठक (२१) विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेच्या (बीएस्सी स्टॅटेस्टीक्स) तिसऱ्या वर्गात शिकत होती. नेहमीप्रमाणे ती गुरूवारी सकाळी महाविद्यालयात आली होती. सकाळी ७.१५ च्या सुमारास तिने तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिला महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. संध्याचा वर्ग तळमजल्यावर होता. ती वर्गात न येता वर कशी गेली ते आम्हाला माहित नाही, असे महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. ती पडल्याचा आवाज आला तेव्हा आम्हाला समजले आणि आम्ही तिला बाबासाहेब गावडे चैरिटेबल ट्रस्टच्या रुग्णालयात नेले. मात्र तिचा मृत्यू झाला, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. ही घटना अत्यंत दुर्देवी आहे. नेमके काय झाले ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणात पोलिसांच्या चौकशीला आम्ही पूर्ण सहकार्य करीत आहोत, असे साठ्ये महाविद्यालयाचे प्राचार्य माधव राजवाडे यांनी सांगितले.
प्रथमदर्शनी संध्याने आत्महत्या केल्याचे आढळून आल्याचे विलेपार्ले पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी अपमृत्यूचा (एडीआर) गुन्हा दाखल केला आहे. महाविद्यालयातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रण पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिच्या वर्गातील मित्र – मैत्रिणींचे जबाब नोंदविण्यात येणार आहेत. तिने आत्महत्येपूर्वी कुठलीही चिठ्ठी लिहिलेली नव्हती, असे पोलिसांनी सांगितले. संध्याचा मृतदेह कूपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. त्यानंतर तो कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.
माझ्या मुलीला ढकलले, वडिलांचा आरोप
संध्या नालासोपारा पूर्व परिसरातील आचोळे रोड येथे रहात होती. तिला एक लहान बहीण असून वडील खासगी कंपनीत काम करतात. मागील तीन वर्षांपासून ती साठ्ये महाविद्यालयात शिक्षण घेत होती. तिच्या मृत्युमुळे कुटुंबियांना प्रचंड मोठा धक्का बसला आहे. संध्याच्या कुटुंबियांनी मात्र ही आत्महत्या नसून या मागे घातपात असल्याचा आरोप केला. संध्या नेहमीप्रमाणे महाविद्यालयात गेली. ती खूप आनंदी होती. आमच्यासोबत तिने सकाळचा चहा घेतला. ती तणावात नव्हती. माझ्या मुलीला नक्कीच कुणी तरी वरून ढकलले असल्याचा आरोप तिचे वडील सुभाष पाठक यांनी केला आहे. या घटनेमागे षडयंत्र आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी तिचे मामा अशोक शर्मा यांनी केली आहे.