राज्यभरात रविवारी सर्वत्र दिवसभर मुसळधार पाऊस सुरू होता. त्यात हवामान विभागाने आगामी ४८ तासांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिलेला असल्याने सोमवार दिनांक ५ ऑगस्ट २०१९ रोजी पालघर, ठाणे, रायगड,मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी देण्यात यावी असा निर्णय शासनाने घेतला आहे.

तसेच, शासकीय कार्यालयात कामावर येणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना देखील पोहोचण्यास विलंब झाल्यास उशीरा येण्याची सवलत देण्यात येईल, असाही निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय नाशिक शहर आणि ग्रामीण भाग, पुणे जिल्हा वरत्नागिरी जिल्ह्यातीलही सर्व शाळांना सोमवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रातील नागरिकांनी उद्या दि.५ ऑगस्ट रोजी आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. असे आवाहन देखील राज्य शासनाकडून सूचित करण्यात आले आहे. उद्या सर्व अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.