मुंबई : केंद्र सरकारच्या विरोधात जाहीरपणे बोलणारे राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांच्यावर कारवाई होईल, याची खात्री होती, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. ईडीने केलेल्या या कारवाईच्या संदर्भात बोलताना शरद पवार म्हणाले की, जे लोक केंद्र सरकारच्या विरोधात किंवा यंत्रणेच्या विरोधात स्पष्ट भूमिका मांडतात, त्यांना त्रास देण्याचे प्रकार घडत असल्याचे दिसत आहे. मलिक हे केंद्र सरकारच्या विरोधात तसेच भाजपच्या विरोधात जाहीरपणे बोलतात, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली आहे. सध्या ज्या पद्धतीने यंत्रणेचा गैरवापर होत आहे, त्याचे हे उदाहरण आहे, असे त्यांनी म्हटले आहे. पवार म्हणाले की, आज ना उद्या कधी तरी हे घडेल याची खात्री होती. कुणी मुस्लीम कार्यकर्ता असला तर दाऊदचे नाव घ्यायचे आणि आरोप करायचे यात काही नवीन नाही. मी राज्याचा मुख्यमंत्री होतो त्या वेळी माझ्यावरही असाच आरोप झाला होता. त्यानिमित्ताने राज्यात एक वातावरण निर्माण झाले होते. त्या घटनेला आता २५ वर्षे पूर्ण झाली. परंतु आजही तशीच नावे घेऊन लोकांना बदनाम करण्याचे व सत्तेचा गैरवापर करण्याचे काम सुरू आहे. संपूर्ण देश काय सुरू आहे हे पाहात आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये काय सुरू आहे हे सर्वाना माहिती आहे. ही कायदेशीर आणि राजकीय लढाई असून आम्ही लढू. - शिवसेना खासदार संजय राऊत