मुंबई – मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या रेल्वेतून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असले तरी त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची कमतरता भासत आहे. रेल्वेत अधिकाऱ्यांची एकूण २५५ पदे मंजूर असली तरी ६५ पदे (२५ टक्के) रिक्त आहेत. दुसरीकडे ४ हजार १८५ पोलीस कर्मचाऱ्यांची पदे मंजूर असून त्यातील ६९३ पदे (१६ टक्के) रिक्त आहेत. मनुष्यबळाच्या कमरतेमुळे रेल्वे स्थानकात पुरेसा बंदोबस्त करता येत नाही. परिणामी रेल्वेतील गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
रेल्वे पोलिसांचे पश्चिम आणि मध्ये असे दोन विभाग आहेत. मध्य परिमंडळ विभागात छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस (सीएसमएटी), कल्याण या दोन रेल्वे विभागांचा समावेश होते. त्यात एकूण १५ रेल्वे पोलीस ठाणी तसेच कल्याण,सीएसएमटी आणि हार्बर अशा ३ सहाय्यक आयुक्तांचा समावेश आहे. पश्चिम परिमंडळात वांद्रे आणि वसई विभागाचा येतात. त्यात एकूण २३ पोलीस ठाणी आणि २ सहाय्यक पोलीस आयुक्तांचा समावेश आहे. त्याशिवाय ३७ अकार्यकारी शाखा आहेत. त्यात मुख्यालय, तांत्रिक शाखा, नियंत्रण कक्ष, विशेष शाखा, सुरक्षा शाखा, कमांडो, महिला कक्ष, न्यायालय कक्ष, दंगल नियंत्रण पथक आदी विविध शाखांचा समावेश आहे. मात्र त्या सर्व विभागात मनुष्यबळाची कमतरता भेडसावत आहे. माहिती अधिकार कार्यकर्त्या वंदना सोनावणे यांनी माहिती अधिकारात या रिक्त पदांची माहिती मिळवली आहे.
अधिकार्यांची ६५ पदे रिक्त
मध्य आणि पश्चिम रेल्वे विभागात अधिकार्यांची एकूण २५५ पदे मंजूर आहेत. परंतु केवळ १९० अधिकारी कार्यरत असून त्यात १७३ पुरूष आणि फक्त १७ महिला अधिकारी कार्यरत आहेत. एकूण मंजूर पदांपैकी ६५ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमध्ये ८ पोलीस निरीक्षक, १७ सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि ४० पोलीस उपनिरिक्षकांच्या पदांचा समावेश आहे. अधिकार्यांची रिक्त पदांची टक्केवारी २५ टक्के आहे.
६९३ पोलीस कर्मचार्यांची पदे रिक्त
मध्य आणि पश्चिम विभागात मिळून एकूण ४ हजार १८५ पोलीस कर्मचार्यांची पदे मंजूर आहेत. त्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (४०६), पोलीस हवालदार (१ हजार २७८) पोली शिपाई (२ हजार ४७८) तसेच २३ चालकांचा समावेश आहे. यापैकी २ हजार ५४९ पुरूष तर ९४३ महिला पोलीस कर्मचारी आहे. मात्र प्रत्यक्षात केवळ ३ हजार ४९२ पदे भरली असून ६९३ पदे रिक्त आहेत.
कर्मचाऱ्यांची एकूण १६ टक्के पदे रिक्त आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रश्न मनुष्यबळाच्या कमरतेमुळे प्रवाशांना पुरेसी सुरक्षा व्यवस्था प्रदान करता येत नाही आणि गुन्ह्यांची उकल देखील वेळेवर होत नाही. नियमानुसार प्रत्येक फलाटावर एक पोलीस कर्मचारी असणे आवश्यक असतो. परंतु ते तैनात करता येत नाहीत. नालासोपारा, कल्याण, सीएसएमटी, ठाणे, कुर्ला आदी स्थानकात गर्दीच्या वेळी विनयभंग आणि छेडछाडीच्या घटना घडत असतात. मात्र तेथेही पोलीस नसल्याने त्यांना अटकाव करता येत नाही.