मुंबई : महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली यांच्याप्रमाणेच शुभमन गिलवर युवा वयातच सर्वंकष कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्याची जोखीम भारतीय क्रिकेट निवड समितीने उचलली आहे. या दोन अत्यंत यशस्वी पूर्वसुरींच्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचे अवघड आव्हान शुभमनसमोर आहे.
महेंद्रसिंग धोनीने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाला गतवैभव मिळवून दिले. विराट कोहलीने गतदशकात कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा दबदबा निर्माण केला. रोहित शर्मानेही मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताला दोन चषक जिंकून दिले. या तिन्ही कर्णधारांच्या कारकीर्दीत भारतीय संघ मैदानातील उत्तमोत्तम कामगिरीसाठी ओळखला जाऊ लागला. सचिन-राहुल-अनिल-लक्ष्मण अशांच्या निवृत्तीचे धक्के सहन करण्याची क्षमताही धोनी-विराट-रोहित या त्रिमूर्तीच्या नेतृत्वाने भारतीय संघाला प्राप्त झाली होती. आता विराट आणि रोहित हे दोघे निवृत्त झाले आहेत. जसप्रीत बुमरा, के. एल. राहुल, रवींद्र जडेजा हे तिघेच अनुभवी क्रिकेटपटू संघात शिल्लक आहेत. अशा परिस्थितीत सर्वाधिक खडतर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंग्लंड दौऱ्याने शुभमनच्या नेतृत्वाची सुरुवात होत आहे. कर्णधारपदासाठी गिल, जसप्रीत बुमरा आणि केएल राहुल या तिघांना प्रमुख दावेदार मानले जात होते. अखेर बुमराच्या तंदुरुस्तीची चिंता आणि राहुलच्या कसोटी कामगिरीत सातत्याचा अभाव, तसेच हे दोघेही तिशीत असल्याने भविष्याचा विचार करून २५ वर्षीय गिलला पसंती देण्यात आली.
● गतवर्षी भारताच्या दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड संघाविरुद्ध शुभमन गिलने दोन शतके झळकवली होती. त्या मालिकेत फलंदाजीबरोबरच गिलच्या क्रिकेटविषयक आकलनाने तत्कालीन प्रशिक्षक राहुल द्रविड प्रभावित झाले.
● कसोटी संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली असली, तरी गिलला आता नेतृत्वगुणांसह फलंदाज म्हणूनही स्वत:ला सिद्ध करावे लागणार आहे. अलौकिक प्रतिभा असलेल्या गिलने ३२ कसोटीत ३५च्या सरासरीने १८९३ धावाच केल्या.
● विशेषत: ‘सेना’ देशांतील (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) त्याची कामगिरी चिंताजनक आहे. इंग्लंडमध्ये खेळलेल्या तीन कसोटीत गिलला केवळ १४.६६च्या सरासरीने धावा करता आल्या आहेत.
● शुभमनकडे क्रिकेटचे बारकावे समजून घेण्याची क्षमता आहे. त्याच्याकडे नेतृत्वगुण आहेत, असे द्रविड यांनी म्हटले होते.