मुंबईकरांनो गरज असेल तरच बाहेर पडा असं आवाहन मुंबई पोलिसांनी मुंबईकरांना केलं आहे. मुंबईत रविवारी रात्रीपासून पावसाची जोरदार हजेरी आहे. यामुळे पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रशासनाला सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. तसंच मुंबई पोलिसांनीही गरज असेल तरच बाहेर पडा असं आवाहन मुंबईकरांना केलं आहे.
मुंबई पोलिसांचं आवाहन काय?
सध्या मुंबईमध्ये सुरू असलेल्या संततधार पाऊसाच्या अनुषंगाने नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे. समुद्रकिनारी व सखल भागात जाणे टाळावे.पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून मुंबई पोलीस सतर्क व मुंबईकरांच्या मदतीसाठी तत्पर आहेत. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास १०० / ११२ / १०३ डायल करा, असं आवाहन मुंबई पोलिसांनी केली.
आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नका-एकनाथ शिंदे
हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, आवश्यक नसल्यास घराबाहेर पडू नये, तसेच सखल भागांमध्ये राहणाऱ्यांनी विशेष सावधगिरी बाळगावी. प्रशासन तुमच्या मदतीसाठी तत्पर आहे, मात्र नागरिकांनी देखील सहकार्य करणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात सध्या मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि नाशिक या जिल्ह्यांत पावसाचा सर्वाधिक जोर दिसून येत आहे. राज्य सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व उपाययोजना राबविण्यात येत आहेत असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
मुंबई मोसमी पाऊस दाखल
मुंबईत अद्याप मोसमी पाऊस दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले नसले तरी मुंबईकरांचा आजचा दिवस पावसाच्या रौद्ररुपासह उजाडला आहे. मुंबईतील अनेक भागांत काल रात्रीपासून संततधार असून नरिमन पॉईंट परिसरात अतिवृष्टी झाल्याचे नोंदींवरून दिसते आहे. अवघ्या एका तासांत, सकाळी ९ ते १० या वेळेत नरिमन पॉइंट परिसरात तब्बल १०४ मिमी पावसाची नोंद झाली, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

दुपारी १२ वाजेपर्यंत देण्यात आला होता रेड अलर्ट
प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे सध्या राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. हवामान विभागाने मुंबईसाठी दुपारी १२ वाजेपर्यंत अतिवृष्टीचा (रेड अलर्ट) इशारा दिला आहे. दरम्यान, रविवारी मध्यरात्रीपासून मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. काही भागात गडगडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे काही भागात पाणी साचले आहे.