मुंबई : सोन्याची विक्री करणाऱ्या कंपनीचे १२ कोटी रुपयांचे दागिने घेऊन पसार झालेल्या कर्मचाऱ्यासह तिघांना बोरिवलीतील एमएचबी पोलिसांनी गुजरात येथून अटक केली. कर्मचाऱ्याच्या वडिलांनी सोने लूटीची योजना आखली होती. मात्र एमएचबी पोलिसांनी सलग ७२ तास तपास करून आरोपींना अटक केली. लूटीतील १२ कोटी रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

जे.पी. एक्सपोर्ट गोल्ड ॲण्ड डायमंड ज्वेलरी ही गुजरातमधीर कंपनी असून ही कंपनी देशभरात सोन्याची विक्री करते. कंपनीचे विक्रेते अजय घागडा (२७) आणि सहाय्यक जिग्नेश कुछडिया (१९) हे दोघे २० जून रोजी मुंबईतील बोरिवली येथील कंपनीच्या मालकीच्या सदनिकेत आले होते. त्यावेळी जिग्नेश कुछडिया सोन्याचे दागिने आणि लगडी असलेल्या दोन बॅगा घेऊन पसार झाला. याप्रकरणी एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींच्या शोधासाठी परिमंडळ ११ चे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके तयार करण्यात आली होती.

कंपनीत काम करणारा जिग्नेश कुछडिया हा मुख्य आरोपी असला तरी लूटीची योजना त्याचे वडील नाथाभाई कुछडिया (५०) याने आखली होती. नाथाभाई हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात गुजरातमध्ये हत्या आणि अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. गुजरातमधील या आरोपींना पकडण्यासाठी रेल्वे, विमानतळ, तसेच मुंबई अहमदाबाद महामार्गावर सापळा रचण्यात आला होता. पोलिसांची वेगवेगळी पथके पोरबंदर, राजकोट, जामनगर, जुनागड या ठिकाणी तपास करीत होती. दरम्यान, हे तिघे आरोप गुजरातमधील जुनागड येथे पळून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस पथकाने पाठलाग करून त्यांची गाडी अडवली आणि जिग्नेश, नाथाभाई, तसेच त्याचा मित्र यश ओडेदरा (२१) या तिघांना ताब्यात घेतले. आरोपींनी माणिकवाडा येथील जंगलात १२ कोटी रुपयांचे सोने लपवून ठेवले होते. ते सोने पोलिसांनी हस्तगत केले आहे. आरोपींना जुनागढ येथील न्यायालयात हजर केल्यानंतर मुंबईत आणण्यात आले. बोरिवलीच्या सत्र न्यायालयाने आरोपींना ३० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

एमएचबी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश पवार, पोलीस निरीक्षक अतुल आव्हाड (गुन्हे) सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबूलाल शिंदे, गणेश तोरगल, गणेश तारगे, वैभव साळुंखे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या लूटीची योजना खूप आधी तयार करण्यात आली होती. त्यानुसार जिग्नेश चार महिन्यांपूर्वी या कंपनीत कामाला लागला होता. कंपनीच्या सर्व कार्यपधद्तीवर त्याचे बारकाईने लक्ष होते. कंपनीच्या कार्यपद्धतीची माहिती तो वडिलांना देत होता. या माहितीच्या आधारे ही योजना तयार करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी सांगितले.