मुंबई : धावत्या लोकलमधून पडून अनेकांना प्राण गमावावे लागत असून त्यावर उपाय म्हणून सर्वच लोकल वातानुकूलित करण्याचा रेल्वे मंडळाचा प्रयत्न आहे. यातच सध्या मध्य रेल्वेवर धावत असलेल्या वातानुकूलित लोकलमध्ये तांत्रिक अडचणी येत असून या तांत्रिक बिघाडांमुळे वातानुकूलित लोकल चालवण्यात मध्य रेल्वे अपयशी ठरत आहे. दरम्यान, गलथान कारभारामुळे सलग दुसऱ्या दिवशी वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की मध्य रेल्वेवर ओढवली. वातानुकूलित लोकलचे तिकीट, पास घेतल्यानंतरही प्रवाशांना सामान्य लोकलमधून प्रवास करावा लागत असून, प्रवासी संतप्त झाले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पावसाने विश्रांती घेतली आहे. काही भागात तुरळक पाऊस आणि कडक ऊन असा खेळ सुरू आहे. बदलत्या वातावरणात उष्णतेपासून बचाव करण्यासाठी प्रवासी वातानुकूलित लोकलमधून प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत. यासाठी अधिक पैसे मोजून प्रवासी वातानुकूलित लोकलचे तिकीट, पास खरेदी करीत आहेत. परंतु, सलग दोन दिवस वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द केल्याने, प्रवाशांना प्रचंड मानसिक ताण सहन करावा लागत आहे. बुधवारी १२ वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द करून त्याऐवजी सामान्य लोकल चालवण्यात आल्या.

मध्य रेल्वेवरील वातानुकूलित लोकलला प्रवाशांकडून प्रतिसाद वाढत आहे. त्यामुळे वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी प्रवाशांकडून होऊ लागली आहे. परंतु, मध्य रेल्वेच्या ताफ्यात जादा वातानुकूलित लोकल रेक नसल्याने, लोकल सेवा वाढविता येत नव्हती. त्यामुळे चेन्नईस्थित इंटिग्रल कोच फॅक्टरीमधून (आयसीएफ) वातानुकूलित लोकलचा एक जादा रेक मुंबईत आणण्यात आला आहे. त्यानंतर, वातानुकूलित लोकल फेऱ्या वाढ करण्यात आली. परंतु, वातानुकूलित लोकलच्या रेकमध्ये तांत्रिक बिघाड होत असल्याने, या लोकल फेऱ्या रद्द करण्यात येतात. त्यामुळे वातानुकूलित लोकल फेऱ्या चालविणे मध्य रेल्वेला डोईजड झाले आहे का, असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला आहे.

मध्य रेल्वेच्या ताफ्यात वातानुकूलित लोकलचे सहा रेक होते. यापैकी पाच रेकच्या वातानुकूलित लोकल फेऱ्या धावत होत्या. तर, एका रेकची देखभाल-दुरूस्ती करण्यात येत होती. परंतु, काही महिन्यांपूर्वी सातवा रेक मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल झाला. त्यानुसार, मध्य रेल्वेवर ६६ वातानुकूलित लोकल फेऱ्यांमध्ये १४ फेऱ्या वाढविण्यात आल्या. त्यामुळे वातानुकूलित लोकलच्या दररोज ८० लोकल फेऱ्या धावण्यास सुरुवात झाली. मध्य रेल्वेच्या ताफ्यात एक पर्यायी रेक उपलब्ध झाल्याने, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत या रेकचा वापर करता येणे शक्य होते. तरीही वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या रद्द करून, त्यावेळी सामान्य लोकल फेऱ्या चालवून, प्रशासन प्रवाशांचे शारीरिक, आर्थिक आणि मानसिक छळ करीत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला.

देशातील पहिली वातानुकूलित लोकल पश्चिम रेल्वेवर डिसेंबर २०१७ रोजी धावली. त्यानंतर मध्य रेल्वेने जानेवारी २०२० रोजी ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे – पनवेलदरम्यान पहिली वातानुकूलित लोकल सुरू केली. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर डिसेंबर २०२० पासून सीएसएमटी – कल्याण मार्गावर दुसरी वातानुकूलित लोकल चालविण्यास सुरूवात केली. अल्प प्रतिसादामुळे ट्रान्स हार्बवरील वातानुकूलित लोकल बंद करण्यात आली. जानेवारी २०२२ रोजी हार्बर मार्गावरून सीएसएमटी – वाशी/ पनवेल आणि सीएसएमटी – वांद्रे / गोरेगाव दरम्यान वातानुकूलित लोकल सुरू करण्यात आली. परंतु, सामान्य लोकल सेवा बंद करून वातानुकूलित लोकल सुरू केल्याने या मार्गावरील वातानुकूलित लोकलला प्रतिसाद कमी मिळाला. प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे सीएसएमटी – पनवेल, गोरेगाव हार्बर मार्गावरील वातानुकूलित लोकल सेवा मे २०२२ पासून बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला. हार्बर मार्गावरील वातानुकूलित फेऱ्यांऐवजी सामान्य लोकलच्या फेऱ्या चालविण्यास सुरुवात केली. तर, हार्बर मार्गावरील वातानुकूलित फेऱ्या बंद करून त्या मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर वळवण्यात आल्या.

सध्या मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर, ट्रान्स-हार्बर आणि बेलापूर – उरण कॉरिडॉर, नेरूळ – उरण पोर्ट मार्गिकेवरून सुमारे दररोज १,८१० लोकल फेऱ्या धावतात. त्यात वातानुकूलित लोकलच्या ८० फेऱ्यांचा समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुर्ला स्थानकादरम्यान २३ जून रोजी वातानुकूलित लोकलचा पॅन्टोग्राफ तुटला होता. या वातानुकूलित लोकल रेकच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यावर वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या पूर्वपदावर येतील.- डॉ. स्वप्निल निला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे