मुंबई : निरनिराळ्या उपाययोजना केल्यानंतरही मुंबई महानगरपालिकेला मानखुर्द परिसर फलकमुक्त करण्यात यश आलेले नाही. मानखुर्द रेल्वे स्थानक परिसरात सातत्याने अनधिकृत फलक लावण्यात येत आहेत. शिवसेनेच्या (ठाकरे) पदाधिकाऱ्यांनी नुकतेच लग्नाच्या आमंत्रणाचे फलक येथे लावले होते. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच महानगरपालिकेने तात्काळ अनधिकृत फलक हटविले. मात्र, आता पुन्हा राजकीय, सामाजिक, तसेच इतर जाहिरातींच्या फलकांमुळे मानखुर्द रेल्वे स्थानक परिसराला बकाल स्वरूप आले आहे. महानगरपालिका या फलकांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
महानगरपालिका प्रशासन मुंबई अधिकाधिक सुंदर, स्वच्छ ठेवण्यासाठी विविध उपक्रम व उपाययोजना करीत आहे. मात्र, विविध कारणांमुळे शहराचे विद्रुपीकरण सुरूच आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अनधिकृत पोस्टर, होर्डिंग, फलकबाजीच्या आव्हानाला पालिकेला सातत्याने सामोरे जावे लागत आहे. मात्र, अद्यापही ही समस्या संपलेली नाही. शहरात राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणात अनधिकृत फलक लावण्यात येतात. गेल्या अनेक वर्षांपासून मानखुर्द भागात अनधिकृत फलकबाजी सुरू असून महानगरपालिकेकडूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
राजकीय मंडळी सार्वजनिक ठिकाणांचा सर्रास वापर करीत आहेत. पाच ते सहा महिन्यांपूर्वी लावलेले फलकही जैसे थे असून सण – उत्सव, राजकीय वाढदिवस आले की त्यात आणखी फलकांची भर पडते. नाक्यानाक्यावर, चौकाचौकात, गल्लीबोळात अनधिकृत फलक लावण्यात आल्याने परिसर विद्रूप झाला आहे. मानखुर्द रेल्वे स्थानक परिसर व नजीकच्या शीव पनवेल महामार्गावरील पूल कायमच राजकीय तसेच सामाजिक, धार्मिक फलकांनी वेढलेला असतो. नियमांना बगल देत अनधिकृत फलक लावण्यासाठी या पुलाचा सर्रास वापर केला जातो.
दोन आठवड्यांपूर्वी या भागात शिवसेनेच्या (ठाकरे) पदाधिकाऱ्याने लग्नाच्या आमंत्रणाचा भलामोठा फलक लावला होता. अनेक दिवस तो फलक जैसे थेच होता. आता पुन्हा संबंधित पदाधिकाऱ्याच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या (ठाकरे) कार्यकर्त्यांनी फलकबाजी केली आहे. त्यालगतच कोचिंग क्लासची जाहिरात झळकत असून अन्य ठिकाणीही वेगवेगळे फलक लावण्यात आले आहेत. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतनिमित्त भाजपतर्फे लावण्यात आलेला फलक, रक्तदान शिबीर, वाढदिवसाच्या फलकांमुळे परिसराला बकाल स्वरूप आले आहे. तसेच, जानेवारी महिन्यात लावण्यात आलेला जत्रेच्या जाहिरातीचा फलक अद्यापही जैसे थे आहे.
मानखुर्दमधील अन्य परिसरातही मोठ्या प्रमाणात अनधिकृत फलक लावण्यात आले असून अनेक महिन्यांपासून त्यावर कारवाई झालेली नाही. ही समस्या वर्षानुवर्ष असल्यामुळे महानगरपालिका त्यावर ठोस उपयोजना का करत नाही, तसेच कारवाई करण्यात दिरंगाई का करते, असा प्रश्न रहिवाशांनी उपस्थित केला आहे.