मुंबई : मागील दोन दिवसांपासून मुंबईत पावसाने हजेरी लावली आहे. शहर तसेच उपनगरात रविवारी पावासाचा जोर अधिक होता. गेल्या २४ तासांत म्हणजेच रविवारी सकाळी ८ वाजल्यापासून सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळला. या कालावधीत पालिकेच्या स्वयंचलित केंद्रावर झालेल्या नोंदीनुसार २४ तासांत वडाळा येथे सर्वाधिक १६१.४ मिमी पावसाची नोंद झाली.
यंदा लवकर दाखल झालेल्या मोसमी पावसाने जूनच्या सुरुवातीपासून उघडीप दिली होती. अधूनमधून हलक्या सरी बरसल्या. मात्र जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम होती. सध्या पावसाला पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे मागील दोन दिवसांपासून मुंबईसह राज्यातील इतर भागातही जोरदार पावासाने हजेरी लावली आहे.
मुंबई शहर, तसेच उपनगरात शनिवारपासून पाऊस कोसळत आहे. रविवारीही पावासाचा जोर कायम होता. मुंबई शहर, तसेच रविवारी सकाळी ८ ते सोमवारी सकाळी ८ पर्यंत पालिकेच्या स्वयंचलित केंद्रावर झालेल्या नोंदीनुसार वडाळा येथे सर्वाधिक पावसाची नोंद झाली. तेथे १६१.४ मिमी पाऊस नोंदला गेला. त्यानंतर माटुंगा येथे १४७.५५ मिमी, लोअर परळमध्ये १४३.४६ मिमी, तर वरळी अग्निशमन केंद्रात १४०.७३ मिमी पावसाची नोंद झाली. पश्चिम उपनगरांमधील वांद्रे येथे १३४.५९ मिमी, तर वांद्रे कुर्ला संकुल येथील अग्निशमन केंद्रात १०३.४ मिमी पावसाची नोंद झाली.
दुसरीकडे, पूर्व उपनगरांत तुलनेने कमी पावसाची नोंद झाली. चेंबूर येथे सर्वाधिक १११ मिमी पाऊस झाला. कुर्ला एल वॉर्ड ऑफिस, पवईतील पासपोली आणि चेंबूर अग्निशमन केंद्र येथे पावसाची नोंद ८१.७४ मिमी ते ८६.५३ मिमी दरम्यान होती. तसेच हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात २४ तासांत ८६ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात १०० मिमी पावसाची नोंद झाली. मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. कुर्ला येथील एल.बी.एस रोडवर पाणी साचले आहे. याचबरोबर रेल्वे विलंबाने धावत आहे.
दरम्यान, राज्यात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. कोकण घाटमाथ्यावर पावासाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. याचबरोबर पूर्व विदर्भात पाऊस वाढणार असून, मराठवाड्यात पावासाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यात आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग , कोल्हापूर, पुणे, सातारा भागात अतिमुसळधार पावासाचा अंदाज व्यक्त केला आहे. याचबरोबर भंडारा, चंद्रपूर, गोंदिया,वर्धा, बुलढाणा, अमरावती, नागपूर या जिल्ह्यांत गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
विमान उड्डाणात व्यत्यय
मुंबईत रविवारपासून कोसळत असलेल्या मुसळधारांमुळे मुंबई विमानतळावरील अनेक विमानांच्या वेळापत्रकात तात्पुरते बदल करण्यात आला आहे. काही विमानाचे उड्डाण विलंबाने होत आहे.