मुंबई : धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्पांतर्गत आणि वरळी येथील खान अब्दुल खान गफार मार्ग स्थित असलेल्या मद्रासवाडीतील एकूण १६९ अनधिकृत बांधकामांवर महानगरपालिकेने हातोडा चालविला. महानगरपालिकेच्या जी दक्षिण विभाग कार्यालयाने निष्कासनाची कारवाई केली.
अनधिकृत बांधकामे निष्कासित करणे आणि नागरी नियमांचे पालन सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने महानगरपालिका आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी यांच्या आदेशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात कारवाई करण्यात येत आहे. याच अनुषंगाने, परिमंडळ २चे उपायुक्त प्रशांत सपकाळे, जी दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली होती.
या कारवाईअंतर्गत पावसाचे पाणी साचण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या मद्रासवाडीतील एकूण १६९ अनधिकृत बांधकामे महानगरपालिका प्रशासनाने जमीनदोस्त केली. एकूण ३५ मनुष्यबळ आणि विविध संयंत्रांच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. कारवाईच्या वेळी वरळी पोलीस ठाण्याने पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणांवर कारवाईची ही मोहीम सातत्याने सुरू राहील, असे महानगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.