नागपूर : कृष्णा-वेण्णेच्या संगमावर वसलेल्या आणि मध्ययुगीन काळात मराठी राजसत्तेचे एक प्रमुख केंद्र राहिलेल्या साताऱ्यात ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मांडव पडण्याची शक्यता आहे. स्थळ निवड समिती शनिवारी साताऱ्याला भेट देणार असून रविवारी पुण्यात संमेलनस्थळाची घोषणा केली जाईल.

मुंबई साहित्य परिषदेचा तीन वर्षांचा कार्यकाळ संपल्याने साहित्य महामंडळ नुकतेच पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे आले आहे. साहित्य परिषदेच्या कार्यवाह सुनीता राजे पवार आणि कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी मूळचे साताऱ्याचेच असल्याने संमेलनासाठी त्यांचा खास आग्रह असल्याचे कळते. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या मनातही साताऱ्याबद्दल विशेष स्नेह आहे.

‘मसाप’च्या शाहूपुरी शाखेकडून साताऱ्यासाठी निमंत्रण आले आहे. याशिवाय ‘मसाप’चीच इचलकरंजी शाखा, सदानंद साहित्य मंडळ, औदुंबर, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर येथूनही निमंत्रणे आल्याने स्थळ निवड समितीने या ठिकाणी भेटी दिल्या. महामंडळ ‘मसाप’कडे आल्यावर पहिले संमेलन साताऱ्याला देण्याचे ठरले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

समितीचा ‘सत्कार’ : स्थळ निवड समिती शनिवारी साताऱ्याला भेट देणार आहे. यावेळी शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून समितीच्या सदस्यांचा सत्कार केला जाणार असल्याची माहिती आहे. हा सत्कार साताऱ्याच्या ‘आदरतिथ्याची परंपरा’ असल्याचे सांगितले जात असले तरी त्यातून संमेलन साताऱ्याला देण्याबाबत अनुकूलता दर्शवणाऱ्या समितीबाबत एक प्रकारे ‘कृतज्ञता’च व्यक्त केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज काही ठिकाणी भेटी दिल्या. उद्या साताऱ्याला जाणार आहोत. सर्व ठिकाणची व्यवस्था तुल्यबळ आहे. त्यामुळे स्थळ निवड समितीच्या अहवालाच्या आधारे अंतिम निर्णय पुण्यात रविवारी जाहीर केला जाईल. – प्रा. मिलिंद जोशी, अध्यक्ष, साहित्य महामंडळ, पुणे.