अकोला: अकोला पुन्हा एकदा ‘हॉट’ शहर ठरले आहे. विदर्भात अकोल्याचे सर्वाधिक ४४.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद शुक्रवारी झाली. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ३ व ४ मे रोजी पऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असून दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले.
राज्यात तापमानामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली. उष्णतेच्या झळांनी नागरिक हैराण झाले आहेत. विदर्भातील बहुतांश शहरांमधील तापमानाचा पारा चढला आहे. अनेक जिल्ह्यातील तापमानाने ४५ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला. मध्यंतरी ढगाळ वातावरणामुळे तापमानात अंशत: घट झाली होती.
आता पुन्हा एकदा तापमान वाढले आहे. शुक्रवारी विदर्भात सर्वाधिक ४४.९ अंश सेल्सिअस तापमान अकोल्यात नोंदवल्या गेले. त्या खालोखाल अमरावती ४३.४, यवतमाळ ४२.६, वाशीम ४२.४, चंद्रपूर ४२.२, बुलढाणा ४१.४, वर्धा ४०.५, ब्रम्हपुरी ३९.८, नागपूर ३९.४, गडचिरोली ३९, गोंदिया ३६ व भंडारा येथे ३६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
दरम्यान, विदर्भातील अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नागपूर येथील प्रादेशिक हवामान विभागाने ३ व ४ मे रोजी विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजाच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. यादरम्यान ताशी ४० ते ५० किमी प्रतितास याप्रमाणे हवेचा वेग राहण्याची शक्यता आहे.
वीज, वारा व पावसापासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यात यावा, या स्थितीत झाडाखाली आश्रय घेऊ नये, पाऊस व विजाच्या स्थितीत मोबाइल फोनचा उपयोग टाळवा, शेतकऱ्यांनी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. या परिस्थितीमध्ये सर्व यंत्रणांनी योग्य ती दक्षता घेण्याच्या सूचना प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत.
उकाड्यामुळे नागरिक त्रस्त
दरवर्षी उन्हाळ्यामध्ये अकोल्यात तापमानाचे विक्रम रचले जातात. ती परंपरा यंदाही कायम आहे. गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील तापमानात मोठी वाढ झाली. शहरातील या वाढत्या तापमानामुळे अंगाची लाही लाही होत असून घामाच्या धारा लागत आहेत. उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. सूर्य आग ओकत असल्याने दुपारच्या सुमारास रस्ते निर्मनुष्य होतात. वाढलेल्या तापमानाचा आरोग्यावर देखील गंभीर परिणाम होत आहे. प्रचंड तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दुपारच्या सुमारास बाहेर पडू नये, आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.