नागपूर : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी काल मतदान झाले. काँग्रेसला विदर्भात मोठ्या विजयाचा विश्वास आहे. येथील ६२ जागांपैकी ३५ ते ४० जागा मिळतील, अशी अपेक्षा काँग्रेसला आहे. त्यामुळे मतदान होताच नियोजन सुरू झाले आहे.

मतदानाचा टक्का वाढल्यानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर पूर्व विदर्भातील आमदारांच्या व्यवस्थेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काँग्रेसच्या आमदाराशी दगाफटका होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे. २३ नोव्हेंबरला निकाल येताच आमदारांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच निवडून येण्याची शक्यता असलेल्या अपक्ष उमेदवारांच्या संपर्कात राहण्याची जबाबदारी विजय वडेट्टीवार यांच्यावरच सोपवण्यात आली आहे.

हेही वाचा…सोन्याच्या दरात मोठे बदल… सराफा व्यवसायिक म्हणतात…

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर लगेचच ‘एक्झिट पोल्स’चे अंदाज यायला सुरुवात झाली. जवळपास सर्वच पोल्सनी महायुतीची सत्ता पुन्हा येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला. महाविकास आघाडीही बहुमतापासून किंचित लांब असल्याचे दिसते आहे. त्यामुळे प्रत्यक्ष निकाल आल्यानंतरच निकालाचे खरे चित्र समजू शकेल. मात्र तत्पूर्वी ‘एक्झिट पोल्स’नी पक्षनिहाय जे अंदाज व्यक्त केले आहेत, त्यावरून काँग्रेस तयारीला लागले आहे.

हेही वाचा…राज्यभरातील कारागृहात तब्बल ७९ टक्के कच्चे कैदी; शासनावर वाढतोय आर्थिक भार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकसभा आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या वेळी विविध वृत्तवाहिन्या आणि संस्थांचे अंदाज साफ चुकले असताना राज्य विधानसभा निवडणुकीतही विविध संस्थांनी संमिश्र अंदाज वर्तविले आहेत. काही संस्थांनी महायुती आणि महाविकास आघाडीत फार अंतर नसेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. रिंगणातील सहा पक्ष, छोटे पक्ष तसेच बंडखोरांमुळे नेमके चित्र स्पष्ट होत नाही. मात्र, काँग्रेसला विदर्भात मोठ्या विजयाचा विश्वास आहे. पण, भाजपची राजकारणाच्या शैली आता जगजाहीर आहे. त्यामुळे काँग्रेस कुठलाही धोका पत्करण्यास तयार नाही. त्यासाठी आतापासून पावले टाकली जात आहेत. आमदारांना कुठल्याही प्रकारचा दगाफटका होऊ नये म्हणून आमदारांना सुरक्षित स्थळी तातडीने नेण्यासाठी विशेष विमान नागपुरात सज्ज ठेवण्यात आले आहे, अशी माहिती आहे.