नागपूर: मराठा समाजाचे आंदोलन पेटले आहे. त्यांना आरक्षण हवे आहे. दुसरीकडे सर्व राजकीय पक्ष आणि ओबीसी संघटनांनी ओबीसीच्या कोट्यातून हे आरक्षण देऊ नये, अशी भूमिका घेतली आहे. सरकार यातून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करीत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी “मराठा समाजासाठी सध्या ओबीसीमध्ये असलेल्या कुणबी समाजानं मोठं मन करावं, असं मोठं वक्तव्य केले आहे. त्याचे तीव्र पडसाद ओबीसी समाजात उमटण्याची चिन्हे आहेत.

अकोला येथे मराठा आंदोलकांनी आमदार अमोल मिटकरी यांच्या घरासमोर आत्मक्लेष आंदोलन केले. आंदोलन सुरू झाल्यानंतर मिटकरी यांनी आंदोलकांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी बोलताना त्यांनी मराठ्यांना कुणबी जातीचे जात प्रमाणपत्र देण्यासाठी ओबीसीतील कुणबींचं मन वळवण्याचं आवाहन केलं. विशेष म्हणजे इतर जातीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या, अशी अजित पवारांसह पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांची भूमिका आहे. अशातच अमोल मिटकरींच्या नव्या भूमिकेनं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान राष्ट्रीय ओबीसी महासंघाने मिटकरी यांना काही प्रश्न केले असून या प्रश्नावर अभ्यास करून बोलावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

हेही वाचा – जळगावमधील उपोषणात सर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग; मुख्यमंत्र्यांऐवजी राज्यपालांना साद…

हेही वाचा – दिवाळीत वीज अपघात टाळायचेय? मग अशी काळजी घ्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय म्हणाले तायवाडे?

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कुणबी समाजाने मोठे मन करून काय होणार? कुठल्याही जातीला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी एक प्रक्रिया ठरली आहे. त्यामाध्यमातून जावे लागेल. मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र दिल्यावर जात प्रमाणपत्राची वैधता सिद्ध करावी लागते. त्यासाठी १९६७ पूर्वीचे पुरावे लागतात. ते कोठून आणणार? असा सवाल राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी केला.