वर्धा : सदस्य नोंदणीआधारे जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असल्याचा दावा भाजपतर्फे पूर्वीच्या नोंदणी संख्येच्या आधारावर करण्यात आला होता. यावेळी मात्र नोंदणीत पिछाडी दिसत आहे. मुदत आटोपली पण निम्मेही उद्दिष्ट पूर्ण झाले नसल्याची स्थिती आहे. हे तेवढेच खरे की आमदार व त्याखालील जिल्हा पदाधिकारी सर्व कामे सोडून हेच काम हाती घेऊन बसले आहे. वरिष्ठ प्रदेश पदाधिकारी नियमित आढावा घेत आहे. पण मुदतीत काम होत नसल्याचे चित्र आहे. हे पाहून आता तिसऱ्यांदा नोंदणीस मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रथम १ ते १५ जानेवारी, दुसरी १५ ते ३१ जानेवारी व तिसरी १ ते १९ फेब्रुवारी अशी मुदतवाढ मिळाली आहे. जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनी यांस दुजोरा दिला आहे.

राज्याचे लक्ष्य दीड कोटी सदस्य नोंदणीचे आहे. ते बरेच दूर आहे. वर्धा जिल्ह्यास २ लाख ६८ हजार ४०० सदस्यांचे लक्ष्य दिले आहे. सध्या १ लाख ३३ हजार ९३६ सदस्य एवढी नोंदणी झाली आहे. ठाणे शहरास २ लाख ३६ हजारचे लक्ष्य दिले. पण झाले केवळ ९२ हजार. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात नोंदणीचे चित्र समाधानकारक नसल्याने मुदतवाढ मिळाली असल्याचे एका संघटन नेत्याने सांगितले. दिलेल्या मुदतीत नोंदणी करतांना अनेक अडचणीयेत असल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. नोंदणी करणारे जे अॅप आहे ते सहजपणे हाताळता येत नसल्याची मुख्य तक्रार होती. म्हणून मग तंत्रस्नेही कार्यकर्ता प्रत्येक गावासाठी देण्यात आला. नोंदणीत वेग आला. पण अपेक्षित लक्ष्य पूर्ण करण्यासाठी अधिक सायास करावे लागणार असल्याचे एका लोकप्रतिनिधिने नमूद केले.

आणखी वाचा-चंद्रपूरच्या बांबू दागिन्यांचे मुंबईकरांना वेड!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टॉप फाईव्ह विधानसभा मतदारसंघ

राज्यात सदस्य नोंदणीत टॉप फाईव्ह विधानसभा मतदारसंघ असे. पनवेल १ लाख २८ हजार, मीरा भाईंदर १ लाख १ हजार, कोथरूढ ९५ हजार, बल्लारपूर ८८ हजार.तर तळास असलेले शेवटचे पाच मतदारसंघ असे. मालेगाव सेंट्रल २ हजार ६००, मेहकर ४ हजार ९००, अर्जुनी मोरगाव ५ हजार ४००, अकोले ६ हजार ६०० व अक्कलकुवा ७ हजार. अशी ३१ जानेवारी पर्यंत नोंद आहे. ही गती आता नव्या मुदतीत वाढविण्याचे निर्देश पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. राज्यात सध्या आकडा ८२ लाखावर पोहचला आहे.