नागपूर : शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचा ५९ वा वर्धापनदिन सोहळा मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पार पडला. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्ष फोडाफोडी आणि नेत्यांच्या पळवापळवीच्या राजकारणावरून भाजपा आणि एकनाथ शिंदे गटावर टीका केली.
महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे नेते राज ठाकरे यांच्याशी संभाव्य युतीबाबत चाललेल्या चर्चेवरही त्यांनी भाष्य केले. मराठी माणूस एकत्र येऊ नये, यासाठी शेठजींचे दिल्लीतील नोकर आणि नोकरांचे नोकर प्रयत्न करत असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच अभिनेते नाना पाटेकर यांच्या प्रहार चित्रपटातील एका संवादाचा आधार घेत त्यांनी एकनाथ शिंदे गटाला थेट आव्हान दिले. यावर आता विविध राजकीय पक्षातून प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे.
उबाठा गटाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातील उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे पराभवाच्या भीतीनं ओकलेली हतबलताच होती. जेव्हा जनाधार संपतो, तेव्हा आरोळ्या वाढतात. तेच आज त्यांनी केलं.
“शिवसेना संपली नाही” म्हणत असताना, स्वतःतर ‘सेना’ गमावलीच, पण ‘शिव’ आणि ‘हिंदुत्व’ हे दोन आधारस्तंभही सोडून उद्धव ठाकरे तुम्ही सोनिया चरणी नतमस्तक झालात. पंतप्रधान मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्यावर वैयक्तिक आरोप करणं सोपं आहे, पण हे नेते जेव्हा देशभर, राज्यभर दौरे करत होते, तेव्हा उद्धव ठाकरे मातोश्रीतून ऑनलाईन भाषण करत होते. हे महाराष्ट्रातील जनतेनं बघितलेलं आहे. जे ‘मुंबई आमची’ म्हणतात, त्यांनी आधी सांगावं की, मुंबईतल्या मराठी माणसाचं काय केलं? महापालिकेत सत्ता असतानाही त्यांच्या झोपड्या, पाण्याच्या योजना, शिक्षण, आरोग्य यावर काही केलं का?”
मुंबईकरांसाठी कोस्टल रोड, मेट्रो, क्लस्टर रिडेव्हलपमेंट, झोपडपट्टी पुनर्वसन योजना या देवेंद्रजींच्या पुढाकारानं झाल्यात हे मुंबईकरांना माहित आहे. मुंबई आमची आहे, हे तुम्ही ओरडून सांगत राहा, पण विकास, सुरक्षितता आणि सन्मान हवा असेल, तर मुंबईवर भाजपा- महायुतीचाच झेंडा फडकला पाहिजे हीच मुंबईकरांची इच्छा आहे!
उद्धवजी, तुम्ही अशीच गरळ ओकत रहा, टिंगल- टवाळी करीत रहा, टोमणे मारीत रहा. तुमचे पुढील आयुष्य यातच जाणार आहे. लोकसेवा आणि लोककल्याणासाठी मनात तळमळ असावी लागते, ती तुमच्यात नाही. ही गोष्ट महाराष्ट्रातील जनतेला यापूर्वीच कळलेली आहे. आता पुढील निवडणुकांमध्ये जनता त्यावर शिक्कामोर्तब करणार आहे.