गडचिरोली : आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरील (क्र.३५३ डी) तमनदाला फाटा ते अमडेली हा एक किलोमीटरचा गिट्टी टाकून तयार केलेला रस्ता वनकायद्यावर बोट ठेवत चक्क ट्रॅक्टर लावून सिरोंचा वनविभागाने नांगरून उद्ध्वस्त केला होता. माध्यमांनी हे प्रकरण लावून धरल्यानंतर आढावा बैठकीत मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वनाधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले होते. अखेर या प्रकरणात वनपरिक्षेत्राधिकारी सुधीर सुरपाम यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

वनकायद्यांच्या जाचक अटी, शर्थींमध्ये जिल्ह्यातील रस्त्यांची कामे अडवून ठेवली जातात, त्यामुळे नागरिकांची गैरसाेय होते, यातून लोक शासनाप्रती रोष व्यक्त करतात. यामुळे वनाधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवून निलंबन करावे, अशी शिफारस सहपालकमंत्री ॲड. आशीष जयस्वाल यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. ६ जून रोजी जिल्हा दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी आढावा बैठकीत उपवनसंरक्षक पूनम पाटे यांना खडेबोल सुनावले होते. ‘वनाधिकाऱ्यांचा दहशतवाद खपवून घेणार नाही, थेट घरी पाठवणार,’ अशा कठोर शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवार धरले होते. अखेर या प्रकरणात १३ जूनला वनपरिक्षेत्राधिकारी सुरपाम यांच्या निलंबनाचे आदेश जारी झाले. मुख्य वनसंरक्षक एस. रमेशकुमार यांनी यास दुजोरा दिला. त्यामुळे वनकायद्याच्या आडून विकास प्रकल्पांना खोडा घालणाऱ्या अधिकाऱ्यांना जबरदस्त चपराक बसली आहे.

प्रकरण काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिरोंचा तालुक्यातील तमनदाला फाटा ते अमडेली या एक किमी रस्त्याच्या दुरुस्तीकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा प्रक्रिया राबवली. कार्यारंभ आदेश घेऊन कंत्राटदाराने काम सुरू केले, पण वनकायद्याचे उल्लंघन होत असल्याचा दावा करून वनविभागाने ते अडवून ठेवले. जुलै २०२४ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने वनविभागाकडे रस्ता कामास मंजुरीचा प्रस्ताव ठेवला. मात्र, वनविभागाचे त्रुटी काढून तो फेटाळला. स्थानिकांची अडचण होऊ नये म्हणून कंत्राटदाराने रस्त्यावर टाकलेली गिट्टी पसरवून रोलरने दाबली. मात्र, वनपरिक्षेत्राधिकारी सुरपाम यांनी भाडेतत्वावर ट्रॅक्टर लावून रस्ता नांगरून काढला. यानंतर कंत्राटदाराने सहपालकमंत्री जयस्वाल यांच्याकडे धाव घेतली होती.