अकोला : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती साेबत एकत्रितपणे लढणार आहे. याचा अंतिम निर्णय प्रदेशाध्यक्ष, कार्यकारी अध्यक्ष, भाजपची निवडणूक समिती घेईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी अकोला येथे स्पष्ट केले.
जिल्ह्यातील अडीच हजार कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन, लोकार्पण आणि विकास संवाद सभेच्यानिमित्ताने मुख्यमंत्री अकोला दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सिंचन, वीज निर्मिती, रस्ते, महिला व बाल विकास, नाट्यगृह अशा सर्व प्रकारच्या विकास कामांची मुहूर्तमेढ अकोल्यात रोवण्यात आली. सर्व लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नातून जिल्ह्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
बच्चू कडू यांच्या आंदोलन प्रकरणी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे संपर्कात आहेत. ते मार्ग काढतील. मुंबई येथील रेल्वे प्रवाशांच्या अपघात प्रकरणी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी सविस्तर चर्चा केली आहे. त्यावर सकारात्मक निर्णय निश्चितच होतील. भाजपमध्ये युती संदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार प्रदेशाध्यक्ष, कार्यध्यक्ष व निवडणूक समितीला आहेत. महायुतीमध्ये निवडणूक लढण्याची आमची भूमिका आहे. एखाद्या ठिकाणी शक्य नसेल त्याठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
राजकारणात फेरबदल होत असतात. मात्र, आमचे सरकार पाच वर्ष राहणार आहे. आम्ही तिघेही सोबत राहणार आहोत, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणे व शिवसेना व मनसेच्या युतीच्या प्रश्नावर ‘बेगानी शादी में अब्दुला दिवाना’ मला व्हायचे नाही, असे उत्तर फडणवीसांनी दिले. मराठा आरक्षण प्रश्नावर आम्ही भक्कमपणे आपली बाजू मांडू. हा कायदा जो तयार केला आहे, तो सर्वोच्च न्यायालयाच्या पातळीवर कायम राहील, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
शरद पवारांशी वैचारिक मतभेद, शत्रू नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी सुप्रिया सुळे गेल्या असता, मोदींनी शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केली. पंतप्रधानांनी माझ्या तब्येतीची विचारपूस केल्याबद्दल मी त्यांचा आभारी असल्याचे शरद पवार यांनी म्हटल हाेते. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणातील माणुसकी, ओलावा कायम असल्याचे दिसून येत असल्याचे सांगितले. आमचे वैचारिक मतभेद असले तरी आम्ही एकमेकांचे शत्रू नाही. वैयक्तिक संवेदना व्यक्त होणे हे सदृढ लोकशाहीचे प्रमाण आहे, असेही ते म्हणाले.