नागपूर : राज्याची आर्थिक स्थिती वाईट असल्याने अनेक योजनांचा निधी बंद करण्यात आला. तसेच आमदार निधी देखील नियमित देण्यात येत नाही. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी आमदारांवर मेहेरनजर दाखवली आहे. ऐन सत्ताधारी आमदारांना कोट्यवधी रूपायांच्या निधीची खैरात वाटली आहे, असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

राज्यात कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आलेला आहे. केंद्र सरकारने लावलेल्या निकषांमुळे तसेच शेतकर्‍यांचा कापूस विकत घेण्याची मंजूरी आलेली नाही, त्यामुळे कापसाला भाव मिळत नाही. हे सरकार सत्ताधारी आमदारांना पाच कोटी रूपयांचा निधी देतात मग कापूस उत्पादक शेतकर्‍यांसाठी सरकारकडे पैसे नाही का? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार यांनी महायुती सरकारचा समाचार घेतला.. महायुती सरकार मधील पहिल्यांदा निवडून आलेल्या ५० आमदारांना सरकारने पाच कोटीचा आमदार निधी दिला. एकीकडे आदिवासी विभाग असो किंवा मागासवर्गीय विभाग यांचा निधी वळवला जात आहे,राज्यावर कर्जाचा बोजा वाढला आहे.

पैसे नाही सांगत सत्ताधारी आमदारांना मात्र निधीची खैरात वाटायची आणि विरोधी पक्षातील आमदारांवर अन्याय करायचे हे महायुती सरकारचे धोरण आहे. आमदार हा लोक प्रतिनिधी असल्याने हा फक्त त्यांच्यावर नाही तर जनतेवर अन्याय आहे. राज्याचा सर्वांगीण विकास होणे हे या सरकारचे धोरण नाही अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या वेळी मतांसाठी लाडकी बहिण योजना आणली. तेव्हा मतांसाठी सरसकट निधी देण्यात आला पण आता या योजनेतील घोटाळे समोर येत आहेत. या योजनेत पुरुषांनी लाभ घेतल्याचे समोर आले. याआधी या योजनेत पारदर्शकता का नव्हती? या सरकारवर या योजनेमुळे भार पडत असल्यामुळे आता अटी शर्ती घातल्या जात असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका झाल्यावर ही योजना सरकार बंद करणार. आता सरकार मधील मंत्री कितीही सांगत असले तरी ही योजना बंद करणार असल्याचा इशारा वडेट्टीवार यांनी दिला.

महाविकास आघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष सामील होणार का या प्रश्नावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडी होती तर विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कुठे आघाडी होणार याबाबत स्थानिक पातळीवर विचारविनिमय होईल. नवीन पक्ष आघाडीत येण्याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल अस काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.