गडचिरोली : आलापल्ली- सिरोंचा या राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३ डी वरील तमनदाला फाटा ते अमडेली या एक किलोमीटर रस्ता गिट्टी टाकून बनविला होता. पण वनकायद्याचे उल्लंघन झाल्याचा बाऊ करत वनाधिकाऱ्यांनी चक्क ट्रॅक्टरने नांगरणी करुन तो उध्वस्त केला. सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित वनाधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवून निलंबनाची कारवाई करावी, अशी शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे.

अतिदुर्ग झिंगानूर परिसरातल्या दहापेक्षा जास्त गावांना जोडणारा तमनदाला फाटा ते अमडेली हा एक किलोमीटर अंतराचा सोयीचा मार्ग आहे. जुन्याच मार्गाच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा प्रक्रिया राबविली. त्यानंतर कार्यारंभ आदेश घेऊन कंत्राटदाराने गिट्टी टाकून काम सुरु केले.

मात्र, या रस्त्याचा काही भाग वनक्षेत्रातून जातो. त्यामुळे वनविभागाने काम अडविले. जुलै २०२४ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने परवानगीचा प्रस्ताव ठेवला, पण वनविभागाने त्रुटी काढून तो प्रलंबित ठेवला. स्थानिकांना रहदारीस अडचण होत असल्याने रस्त्यावर टाकलेली गिट्टी पसरवून रोलरने दबाई करण्यात आली. मात्र, यानंतर वनपरिक्षेत्राधिकारी सुधीर सुरपाम यांनी ट्रॅक्टरने नांगरणी करुन बनविलेला रस्ता खोदून काढला. त्यामुळे कंत्राटदाराला आर्थिक नुकसान सहन करावे लागले.

सिरोंचा- आलापल्ली रस्त्याचे कामही धरले होते रोखून

दरम्यान, सिरोंचा- आलापल्ली महामार्गावर खासगी बस चिखलात फसल्याने प्रवाशांना पायपीट करावी लागल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमावर प्रसारित झाला होता. या मार्गाचे काम देखील वनविभागाने चुकीचे निकष लावून रोखून ठेवले होते, असे स्पष्टीकरण सहपालकमंत्री ॲड. जयस्वाल यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केले आहे.

उपवनसंरक्षकांची कानउघाडणी

सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. उपवनसंरक्षक पूनम पाटे यांची त्यांनी भ्रमणध्वनीवरुन चांगलीच कानउघाडणी केली. देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री असतानाही जिल्ह्याचे पालकमंत्री होते. तेव्हा देखील वनकायद्यामुळे अडवून ठेवलेल्या प्रकल्पावरुन त्यांनी भरबैठकीत पूनम पाटे यांना कडक शब्दांत सुनावले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शासनाच्या प्रतिमेला धक्का

सहपालकमंत्री ॲड. जयस्वाल यांनी मुख्यमंत्र्यांना ३० मे रोजी पत्र लिहून तपशीलवार माहिती देत उपवनसंरक्षक पूनम पाटे व वनपरिक्षेत्राधिकारी सुधीर सुरपाम यांच्या कारनाम्याविषयी कळविले आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर बनवलेला रस्ता खोदल्याने कंत्राटदाराने तर नुकसान झालेच, पण स्थानिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. यातून शासनाची प्रतिमा मलिन झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांचीउच्चस्तरीय चौकशी करावी, अशी शिफारस त्यांनी केली आहे. रस्ता खोदण्यासाठी खर्च कोठून केला, यास मंजुरी कोणी दिली, स्वखर्चाने रस्ता खोदला असेल तर वनसंरक्षण कायद्यान्वये गुन्हा नोंद होणे गरजेचे आहे, असे सहपालकमंत्र्यांनी पत्रात म्हटले आहे.