नागपूर: लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने ‘अब की बार ४०० पार’ असा प्रचार नारा देण्यात आला होता. यावर काँग्रेसने आक्षेप घेत,  भाजपला ४०० पेक्षा जास्त जागा मिळल्यास ते देशाचे संविधान बदलवणार असा प्रचार केला होता. संविधान बदलाच्या प्रचाराचा भाजपला निवडणुकीत फटका बसल्याचा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. तेव्हापासून भाजपनेही संविधानाची खरी हत्या काँग्रेसने कशी केली, हे पटवून देण्यावर भर दिला. काँग्रेसचे खोटा समज निर्माण केल्यामुळे लोकसभेत फटका बसल्याचा आरोपही भाजपने यावेळी केला. त्याचाच भाग म्हणून भाजपने आता देशात लागू केलेल्या आणीबाणीच्या निर्णयाला ५० वर्ष झाल्यानिमित्त आणीबाणीत संघर्ष करणाऱ्यांच्या स्मरणार्थ विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. तसेच भाजपच्यावतीने संविधान हत्या दिवस म्हणून पाळला जाणार आहे. राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने यासंदर्भात समाज माध्यमांवर ‘संविधान हत्या दिवस’ असा संदेश देणारे अनेक व्हीडीओ प्रसारित केले आहेत. त्यावर दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया उमटत आहेत.

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संविधान हत्या दिवसावर मुंबई येथील एका कार्यक्रमात मार्गदर्शन केले. “आणीबाणीच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान संपविण्यात आले होते. सर्वच विरोधी पक्ष त्यावेळी आणीबाणीच्या विरोधात रस्त्यावर उतरले. त्यांना तुरुंगात डांबण्यात आले. ज्यांचे लग्न झाले नव्हते, त्यांचेही कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन करण्यात आले. अनेक घरांची तोडफोड करण्यात आली. अनुशासनाच्या नावाखाली अशरक्षः उन्माद त्या काळात देशाने पाहिला. या सर्वांची बातमी होऊ नये म्हणून वृत्तपत्रावर निर्बंध आणले गेले”, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणीबाणीच्या विरोधात बोलताना सांगितले. माहिती विभागाने प्रसारित केलेल्या व्हीडीओमध्ये आणीबाणीच्या काळात संविधानाची हत्या कशी झाली, याचा संदेश तरुण पिढीला दिला जात आहे. तरुणांमध्ये आणीबाणीच्या काळाची माहिती करून देण्यावर या व्हीडीओचा भर आहे. येणाऱ्या पिढीला काँग्रेसच्या म्हणजेच माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या काळात संविधानाची कशाप्रकारे हत्या करण्यात आली, यावर जनजागृती केली जात आहे. अनेक व्हीडीओंमधून तरुणांना हा संदेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावर काही प्रतिक्रिया या सरकारच्या विरोधात आहेत. तर काही प्रतिक्रिया या सरकारच्या अशा व्हीडीओंना विरोध करणाऱ्याही असल्याचे दिसून येते.