यवतमाळ : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांनी आर्णी तालुक्यातील दाभडी गावात ‘चाय पे चर्चा’ हा इव्हेंट घेतला. यावेळी त्यांनी भाजप सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासोबतच हमीभावासह अनेक आश्वासने दिली. प्रत्यक्षात भाजपची सत्ता आल्यानंतर गेल्या ११ वर्षांत यातील एकही आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले नाही. त्यांना या आश्वासनांची पूर्तता करण्याची आठवण करून देण्यासाठीच काँग्रेसने दाभडी येथे शेतकरी आत्मसन्मान पदयात्रेचे आयोजन केले, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.

आर्णी तालुक्यातील दाभडी येथे काँग्रेसच्या वतीने आज मंगळवारी शेतकरी सन्मान पदयात्रेत प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी चंद्रपूर-आर्णीच्या खासदार प्रतिभा धानोरकर, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, प्रा. वसंत पूरके, महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रफुल्ल मानकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील आदी उपस्थित होते. दाभडी येथील पुरातन ओंकारेश्वर मंदिरातून या पदयात्रेस प्रारंभ झाला. पदयात्रेत असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांसह पदाधिकारी, नेते व सामान्य नागरिक सहभागी झाले होते. दाभडी येथून निघालेली ही पदयात्रा १० किलोमीटरवर असलेल्या आर्णी येथे पोहोचणार आहे. येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात या पदयात्रेचा समारोप आणि शेतकरी मेळावा होणार आहे.

दाभडी येथे २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘चाय पे चर्चा’ केली होती. यावेळी शेतकर्‍यांना अनेक आश्‍वासने दिली. प्रत्यक्षात एकही आश्‍वासन पूर्ण केले नाही. शेतकर्‍यांना खोटी आश्वासने देऊन सत्ता काबीज केली, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी केला. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात तसेच जाहिरनाम्यात शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची घोषणा महायुतीने केली होती. मात्र, सत्तेवर आल्यानंतर कर्जमाफी तर दूरच, खत, बियाणे, औषधांचे भाव बेसुमार वाढवले आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यावर सातत्याने अन्याय होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, राज्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र पुन्हा वाढले, याकडे काँग्रेस नेत्यांनी यावेळी लक्ष वेधले. शेतकऱ्यांना संपूर्ण कजर्माफी, शेतमालाला हमीभाव, सकसकट पीकविमा, मोफत वीज, आदी महत्वाच्या मागण्या या पदयात्रेच्या माध्यमातून करण्यात आल्या. पदयात्रेत काँग्रेसचे आजी, माजी आमदार, सर्व तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, महिला आघाडी यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.