यवतमाळ : भाजपच्या पंतप्रधान पदाचे उमेदवार असताना नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील दाभडी (ता. आर्णी) येथून देशभरातील शेतकऱ्यांना न्याय देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दाभडीतील ‘चाय पे चर्चा’ हा इव्हेंट निवडणूक जुमला होता. भाजपची सत्ता आल्यानंतर आज ११ वर्षानंतरही महाराष्ट्रासह देशातील शेतकरी हताश आहेत. केंद्र व राज्य सरकार शेतकरी विरोधी असल्याचे स्पष्ट झाले. शेतकऱ्यांच्या लढा दिल्लीपर्यंत घेऊन जाण्यासाठी दाभडी गावातूनच ही न्यायची लढाई आम्ही सुरू केली, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.

दाभडी येथील पुरातन ओंकारेश्वर मंदिरातून मंगळवारी सकाळी शेतकरी आत्मसन्मान पदयात्रेला प्रारंभ झाला. १० किलोमीटर अंतर पार करून या पदयात्रेचा आर्णी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात समारोप झाला. यावेळी बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर जोरदार टीका केली. याप्रसंगी चंद्रपूर-आर्णीच्या खासदार प्रतिभा धानोरकर, खासदार प्रणिती शिंदे, आमदार राजेश राठोड, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, प्रा. वसंत पूरके, महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल मानकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील आदी उपस्थित होते.

शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, पण आज त्याचे मोठे हाल होत आहेत,असे सपकाळ म्हणाले, शेतकऱ्याने आपला माल साठवून ठेवला, भाव मिळेल अशी आशा होती, पण तसे झाले नाही. सोयाबीनला भाव नाही, मात्र त्यापासून तयार होणाऱ्या तेलाला मोठा भाव आहे. यातून कंपन्या प्रचंड नफा कमवत आहेत, पण शेतकऱ्याला काहीच मिळत नाही. घर-घर तिरंगा उपक्रमात पॉलिस्टरचा झेंडा लावला गेला. जर कापडाचा झेंडा वापरला असता, तर कापसालाही भाव मिळाला असता. पण सरकारचा हेतू शेतकऱ्याच्या भल्याचा नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील, तर ही परिस्थिती तातडीने बदलायला हवी, असे ते म्हणाले. ही पदयात्रा केवळ दाभडी ते आर्णी एवढी मर्यादित नाही, तर ती दिल्लीपर्यंत नेण्यात येणार आहे. ‘आज करोगे या मरोगे’ अशी परिस्थिती आहे. म्हणूनच ही लढाई फक्त काँग्रेसची न राहता सर्वसामान्य जनतेची आहे. शेतकरी आपल्या पोटासाठी लढतो, जवान देशासाठी लढतो – पण सरकार कुणासाठी लढते? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मतपत्रिकेवर निवडणूक घ्या-प्रणीती शिंदे

यावेळी बोलताना खासदार प्रणीती शिंदे यांनी जिल्हा परिषद आणि नगर परिषद निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी केली. शेतकरी, महिला, दलित यांचे हाल सुरूच आहेत. सरकारने दिलेली आश्वासने फसवी ठरली आहेत, असे शिंदे म्हणाल्या. यावेळी बोलताना आमदार राजेश राठोड म्हणाले, खरा मालक असलेला शेतकरी आपल्या उत्पादनासाठी, भावासाठी लढतो आहे, ही शोकांतिका आहे. रोजगार हमी योजना काँग्रेसने दिली, पण आज त्याचा लाभ मिळत नाही.

खासदार प्रतिभा धानोरकर यांनीही पंतप्रधान मोदींना २०१४ साली दिलेली आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी या पदयात्रचे आयोजन असल्याचे सांगितले. भाजप सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, असे त्या म्हणाल्या. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काँग्रेसचा लढा अधिक तीव्र करण्याचा निश्चय यावेळी काँग्रेस नेत्यांनी केला. या पदयात्रेत काँग्रेसचे आजी-माजी आमदार, तालुका व शहराध्यक्ष, महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांसह शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला.

मोदींच्या भेटीनंतरही परिस्थिती जैसे थे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या पदयात्रेदरम्यान हर्षवर्धन सपकाळ यांनी, २०१४ मध्ये दाभडी गावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या शेतकऱ्याच्या शेतात भेट देऊन पिकांची पाहणी केली, त्या शेतात भेट देऊन पाहणी केली. ग्रामस्थांशी संवाद साधून मोदी यांच्या ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमानंतर गावात काय बदल झाले, जीवनमान उंचावले का, रोजगार वाढले का, मूलभूत समस्या सुटल्या का, पिकांना हमी भाव मिळाला का, असे विविध प्रश्न विचारले. मात्र गेल्या ११ वर्षात गावात, राहणीमानात कुठलाच बदल झाला नसून, मोदींच्या भेटीमुळे फायदा होण्याऐवजी नुकसानच झाल्याच्या प्रतिक्रिया ग्रामस्थानी दिल्या.