अमरावती : आमच्या पक्षाने विधानसभा निवडणुकीत ८० जागा लढवल्या आणि ६० जागा जिंकल्या, पण जे सांगत होते, आम्ही एकही जागा जिंकणार नाही, ते शंभर जागा लढले आणि केवळ २० ठिकाणी जिंकले. अत्यंत कमी मतांनी आमचा सात-आठ जागांवर पराभव झाला, अन्यथा यापेक्षाही कमी जागा त्यांना मिळाल्या असत्या.

लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व असते. त्यामुळेच धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आपल्याकडे आहे. ते जनतेच्या न्यायालयात गेले, जनतेने त्यांना कायमचे घरी बसवले. घरी बसणाऱ्याला लोक मतदान करीत नाहीत. आता नेते युरोपात आणि कार्यकर्ते कोमात आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख न करता केली.

येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात गुरूवारी सायंकाळी शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या मेळाव्याला मंत्री उदय सामंत, संजय शिरसाट, संजय राठोड, आशीष जयस्वाल, माजी खासदार आनंदराव अडसूळ, माजी आमदार अभिजीत अडसूळ आदी उपस्थित होते.

एकनाथ शिंदे म्हणाले, आमचे कायकर्ते हे जनसेवेसाठी लोकांच्या दारात आहेत. कार्यकर्ता हा लोकांच्या दारात शोभून दिसतो, असे बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. त्यांचेच विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत. आम्ही ‘शासन आपल्या दारी’ ही योजना घेऊन आलो. ५ कोटी लोकांनी त्याचा लाभ घेतला. पण, काही लोक घराच्या बाहेर पडत नाहीत आणि पडले, तर थेट विदेशातच जातात, असा टोला शिंदे यांनी लगावला.

उद्धव ठाकरे यांच्या युरोप दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी ही टीका केली. एकनाथ शिंदे म्हणाले, माजी आमदार दिवंगत संजय बंड हे सच्चे शिवसैनिक होते. पण, त्यांना काय मिळाले. एखादा कार्यकर्त्याला धुळीला कसे मिळवायचे, याचे क्लासेस जर लावयाचे असतील, तर मुंबईमध्ये बांद्रा येथे एकच ठिकाण आहे. आमची कुठेही शाखा नाही, असे ते मिश्कीलपणे म्हणाले.

संजय बंड यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी प्रीती बंड यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहायला हवे होते, पण ताटातले काढून, वाटीतले काढून घ्यायचे ही सवयच काही लोकांना लागलेली आहे. पण आता प्रीती बंड यांनी पदर खोचलेला आहे. हातात धनुष्यबाण घेतलेला आहे. आता तुम्हाला पुर्वीचा अनुभव येणार नाही. तुमच्या पाठीशी एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.