नागपूर : राज्यातील मानव-वाघ संघर्ष आणि वाघाचे मृत्यू हे दोन्ही विषय संवेदनशील झाले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला राज्यात वाघांच्या मृत्यूचे सत्र सुरू झाले आणि वनखात्यासह सारेच हादरले. वाघांच्या मृत्यूची मालिका अजूनही थांबलेली नाही, तर राज्यात वाघाचे मृत्यू सुरुच आहेत. पेंच व्याघ्रप्रकल्पालगत कुजलेल्या अवस्थेतील वाघाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

नागपूर प्रादेशिक वन विभागाच्या देवलापार वनपरिक्षेत्रात एका वाघाचा मृतदेह आढळला. ही घटना पेंच वन्यजीव अभयारण्याशेजारील कक्ष क्रमांक २७५ पीएफजवळ घडली. शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास वन कर्मचाऱ्यांना गस्त घालत असताना वाघाचा विस्कळीत मृतदेह दिसला. त्यांनी लगेच वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना सूचना दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार, वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाभोवती सुमारे दोन किलोमीटरच्या परिसरात पाहणी केली. त्या संपूर्ण परिसरात तपास केला. पण कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळली नाही. त्याचवेळी, मृत वाघाच्या शरीराचे सर्व अवयव शाबूत आढळल्याने, शिकार होण्याची शक्यता नाकारली जात आहे.

त्यानंतर, राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, डॉ. बबिता मेश्राम, डॉ. राजेश फुलसांगे, डॉ. मयंक बर्डे यांनी पेंचचे क्षेत्र संचालक किशोर मानकर, प्रादेशिक वनविभागाचे उपवनसंरक्षक डॉ. भरतसिंग हाडा, विभागीय वनाधिकारी पी. कोडापे, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे प्रतिनिधी म्हणून अजिंक्य भाटकर आणि प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांचे प्रतिनिधी म्हणून मंदार पिंपळे यांच्या उपस्थितीत वाघाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. डीएनए चाचणी अहवाल आल्यानंतर वाघाचे वय आणि लिंग स्पष्ट होईल. पुढील तपास रामटेकचे एसीएफ पांडुरंग पखाले करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून पेंच व्याघरप्रकल्पालगतच्या परिसरात मानव-वाघ संघर्ष सुरू झाला आहे. पर्यटनात वाढ झाल्यापासून या घटना वाढीस लागल्या आहेत. आतापर्यंत या परिसरात वाघांच्या हल्ल्याच्या घटना क्वचितच होत होत्या, मात्र मानव-वन्यजीव संघर्षाची झळ या परिसराला देखील बसली आहे. त्यामुळे गावकऱ्यांचा रोष वाढतच चालला आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यासारखी परिस्थिती येथेही निर्माण होणार नाही ना, अशी भीती व्यक्त केली जात आहे. प्रामुख्याने प्रादेशिक वनविभागात मानव-वन्यजीव संघर्ष घटना वाढत आहेत.