* डॉ. राजू मानकर यांना विश्वास * ‘लोकसत्ता’ कार्यालयाला सदिच्छा भेट संस्थेला स्वायत्तता मिळाल्यास संस्थेचा चेहरा मोहरा बदलू शकेल. पण, मुख्य अडचण आहे ती मनुष्यबळाची. त्यासंदर्भात विद्यापीठाने नुकतीच जाहिरात दिली आहे. त्यानुसार नियुक्तया झाल्यास संस्थेला अधिकाधिक ऊर्जितावस्था येईल, असा विश्वास लक्ष्मीनारायण तंत्रशास्त्र संस्थेचे (एलआयटी) संचालक डॉ. राजू मानकर यांनी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयाला सदिच्छा भेटीदरम्यान व्यक्त केला. रासायनिक अभियांत्रिकीमधील मध्य आशियातील सर्वात जुनी व नावाजलेली संस्था म्हणून ‘एलआयटी’चा दबदबा आजही कायम आहे. या संस्थेने अनेक रासायनिक अभियंते तयार केले असून देशात आणि परदेशातही संस्थेचे नाव ते उज्ज्वल करीत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ संचालित लक्ष्मीनारायण तंत्रशास्त्र संस्थेने अमृत महोत्सवी वर्षांत पदार्पण केले असल्याने वर्षभरापासून वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ज्या प्रमाणे स्थापत्य अभियंता, मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिक अभियंता म्हणून लोक समाजातील सर्वसामान्य माणसांना त्याची माहिती असते. त्या तुलनेत रासायनिक अभियंता म्हणून थोडेच लोक ओळखतात. शहरातील विद्यार्थीच नव्हे तर पालकांचा ओढाही पुण्याकडे असतो. मात्र, ग्रामीण भागातील लोक आजही ‘एलआयटी’ला प्राधान्य देतात. या संस्थेत शिकणारा विद्यार्थी आजही कुणाचा तरी आदर्श किंवा ओळख घेऊन संस्थेत दाखल होत असतो. रासायनिक अभियांत्रिकी पदवीचे उत्तम शिक्षण दिले जाते. एलआयटीमध्ये ९०टक्के विद्यार्थ्यांना नोकऱ्या उपलब्ध होतात उर्वरित १० पीएच.डी. किंवा संशोधनाच्या क्षेत्रात जातात, असे डॉ. मानकर म्हणाले. संस्थेला स्वायत्तता आवश्यक आहे. संस्थेत पुरशा पायाभूत असतील तरच ती मिळणे शक्य होते. मात्र, एलआयटीमध्ये मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे. निधीची कमतरता नाही. प्रकल्प खूप येतात आमच्याकडे पण, निधी आला तरी तो हाताळण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ पाहिजेच. त्यामुळे अनेकदा आयआयटीमध्ये ज्या प्रमाणे वेगवेगळ्या प्राध्यापकाच्या नावाने अध्यासने असतात, तशी अध्यासने उभारण्याचा डॉ. मानकर देतात. २८ पदे एलआयटीमध्ये रिक्त असून १३ पदांची जाहिरात नुकतीच विद्यापीठाने दिली आहे. त्यापैकी १० जरी पदे भरली तरी नॅक किंवा नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रेडिशन (एनबीए) करणे शक्य होईल. मुंबईचे आयसीटी,व्हीजेटीआय, पुण्याचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नांदेडचे एसजेजीएस, कराड वा अमरावतीचे अभियांत्रिकी महाविद्यालये यांना स्वायत्ता मिळाल्यानंतर त्यांचा चेहरामोहरा बदलला. म्हणूनच ‘एलआयटी’ला स्वायत्तता मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि कुलगुरूंचीही त्यास संमती असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेकडे मनुष्यबळ नसले तरी आजही ऑईल, फूड तंत्रज्ञानामध्ये संशोधनाची कामे सुरू आहेत. नॅनो टेक्नॉलॉजीवर संशोधन सुरू आहे आणि उद्योगांचे सल्लागार म्हणूनही अनेक कंपन्यांना सल्ला देणे किंवा संशोधनातून त्यांच्या समस्या सोडवण्याचे काम सुरू आहे. संस्थेच्या अमृत महोत्सवानिमित्त आंतरराष्ट्रीय परिषद येत्या डिसेंबरमध्ये आयोजित करण्यात येणार असून रासायनिक अभियांत्रिकीतील नावाजलेल्या डॉ. जे.बी. जोशी, डॉ. बी.डी. कुलकर्णी, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजचे डॉ. रेड्डी आदींना निमंत्रित करण्यात येणार असल्याचे डॉ. मानकर म्हणाले. ‘एलआयटी’च्या स्वायत्ततेसाठी प्रयत्नशील मुंबईचे आयसीटी, व्हीजेटीआय, पुण्याचे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नांदेडचे एसजेजीएस, कराड वा अमरावतीचे अभियांत्रिकी महाविद्यालय यांना स्वायत्ता मिळाल्यानंतर त्यांचा चेहरामोहरा बदलला. म्हणूनच ‘एलआयटी’ला स्वायत्तता मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि कुलगुरूंचीही त्यास संमती आहे. - डॉ. राजू मानकर, लक्ष्मीनारायण तंत्रशास्त्र संस्थेचे (एलआयटी) संचालक.