यवतमाळ : पूराच्या पाण्याने गावाला वेढा घातला, जीव वाचवण्यासाठी दोन शेतकरी लिंबाच्या झाडावर अडकून बसले होते… मृत्यू आणि जीवनाच्या सीमेवरचा हा संघर्ष शेवटी प्रशासनाच्या तत्परतेमुळे सुखरूप संपला.
आर्णी तालुक्यातील खंडाळा शिवारात मंगळवारी संध्याकाळी देवगाव प्रकल्पाचे सांडव्याचे पाणी शिरले. पुराच्या पाण्यात शेतकरी जीवन राठोड व नितेश राठोड अडकले. बचाव करण्यासाठी त्यांनी जवळच्या लिंबाच्या झाडाचा आधार घेतला आणि जवळपास तासभर मृत्यूच्या छायेत थांबावे लागले. घटनेची माहिती मिळताच आर्णीचे तहसीलदार वैशाख वाहुरवाघ यांनी प्रसंगावधान दाखवत स्वतःच घटनास्थळी धाव घेतली. तालुका कार्यालयातून लाईफ जॅकेट, लाईफ बॉय आणि दोरखंड घेऊन ते खंडाळ्यात पोहोचले. स्थानिक तरुणांच्या मदतीने राबविलेल्या थरारक बचाव मोहिमेत रात्री १० वाजता दोन्ही शेतकऱ्यांना सुखरूप बाहेर काढले. तहसीलदार वाहुरवाघ यांची धाडसी कृती आणि गावकऱ्यांचे साहस यामुळे दोन शेतकऱ्यांचे प्राण वाचले.
पुस, वाघाडी, सायखेडा व नवरगाव प्रकल्प १०० टक्के भरले
यवतमाळ जिल्ह्यातील प्रमुख मोठ्या व मध्यम प्रकल्पांमध्ये पावसामुळे पाणीसाठा समाधानकारक प्रमाणात झाला आहे. २० ऑगस्ट रोजी सकाळपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार पुस, वाघाडी, सायखेडा आणि नवरगाव हे प्रकल्प १०० टक्के भरले आहे. पूस अरुणावती, बेंबळा, गोकी, वाघाडी, सायखेडा, लोअर पुस, बोरगाव, अडाण, नवरगाव आदी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसाने पुसद, उमरखेड तालुक्यात पुराने मोठी हानी झाली. उमरखेड तालुक्यातील पळशी गाव दोन दिवस पाण्याखाली होते.