अकोला : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील एका गावाचे पुनर्वसन झाल्याने बाप- लेकीच्या जीवनात शिक्षणाची नवी पहाट उजाडली. गावाच्या पुनर्वसनानंतर वडील व मुलीने दहावीचे धडे गिरवून एकत्रित परीक्षेत उत्तीर्ण झाले. दुर्गम ग्रामीण भागातून आलेल्या मुलीने कॉन्व्हेंटमधून शिक्षण घेत तब्बल ८८.८० टक्के गुण मिळवले, तर लहानपणापासून शिक्षणाची इच्छा असलेल्या वडिलांनी दहावीचे शिक्षण घेत ४१ टक्के गुणांसह उत्तीर्ण झाले. शिक्षणासाठी बाप लेकीची जिद्द समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. व्याघ्र प्रकल्पातील गावाच्या पुनर्वसनाचा असाही सकारात्मक परिणाम दिसून आला.
दुर्गम आदिवासी भागात अद्यापही शिक्षणाचा प्रवाह पोहोचलेला नाही. शिक्षण घेण्याची नितांत इच्छा असतानाही सुविधा नसल्याने किंवा आर्थिक क्षमतेच्या अभावाने अनेकांना जीवनभर अशिक्षितच राहावे लागते. मात्र, मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गावांच्या पुनर्वसनामुळे एक सकारात्मक परिणाम आज समोर आला. काल दहावीचा निकाल लागला. यामध्ये प्रमोद खांडवये व त्यांची मुलगी स्नेहा प्रमोद खांडवये यांचा प्रेरणादायी व समाजासाठी दिशादर्शक निकाल लागला आहे.
प्रमोद खांडवये हे पूर्वी मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुल्लरघाट या गावात राहत होते. शिक्षणाची आवड होती. मात्र, घरच्या बेताच्या आर्थिक परिस्थितीसह जंगलात शिक्षणाची व्यवस्था नसल्यामुळे ते शिक्षण घेऊ शकले नव्हते. पुढे अकोट वन्यजीव विभागात रोजंदारीवर वनमजूर म्हणून ते कामाला लागले. २०१३ साली मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून गुल्लरघाट गावाचे पुनर्वसन झाले.

प्रमोद खांडवये यांचा परिवार दहिखेड फुटकर या नवीन गावात स्थलांतरीत झाला. प्रमोद खांडवये यांच्या मनात गाव सोडण्याचे दुःख होतेच, परंतु आपल्या पाल्याला चांगले शिक्षण घेता येईल, तिचे भविष्य उज्ज्वल होईल, याचे समाधान सुद्धा होते.  गावाचे पुनर्वसन झाले तेव्हा त्यांची मुलगी पहिल्या वर्गात शिकत होती. त्यांनी लेकीला अकोटमधील कॉन्व्हेंटमध्ये पुढील शिक्षण घेण्यासाठी टाकले. तिची शैक्षणिक प्रगती करण्यासोबतच स्वतः देखील पुन्हा शिक्षणाचे धडे गिरवायले. यावर्षी बाप-लेकीने एकत्र दहावीची परीक्षा दिली. प्रमोद खांडवये यांना ४१ टक्के, तर स्नेहा ८८.८० टक्के गुण घेऊन प्रावीण्यसह उत्तीर्ण झाली. स्नेहाला भविष्यात डॉक्टर व्हायचे आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवीन दिशा

राज्य शासनाने गावाच्या पुनर्वसनाचा निर्णय घेतल्यामुळे ग्रामस्थांना आज शिक्षणाची नवीन दिशा मिळाली. प्रमोद खांडवये व स्नेहा खांडवये यांच्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास निसर्गकट्टाचे अमोल सावंत यांनी व्यक्त केला.