बुलढाणा : जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील आणि मध्यप्रदेश राज्याच्या सीमेला लागून असलेल्या जळगाव नगरीची आजची सकाळ भीषण आगीच्या बातमीने उजाडली! एका दुकानाला लागलेल्या आगीत लाखोंची हानी झाली असली तरी सकाळची वेळ असल्याने सुदैवाने प्राणहानी टळाली.मात्र टँकरमध्ये पाणी कमी असल्याने आगीवर नियंत्रण मिळवायला दीर्घ वेळ लागला.
जळगाव (जामोद) नगरीत आज सोमवारी, १२ मे रोजी पहाटे सकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास हा थरारक घटनाक्रम घडला. शहराच्या मुख्य परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात राधे कोल्ड्रिंक्स नावाचे व्यापारी प्रतिष्ठान आहे. या दुकानाला आज सकाळी साडेपाच वाजताच्या आसपास भीषण आग लागल्याचे दिसून आले. सकाळच्या वेळी लागलेली आग पाहतापाहता वेगाने भडकली. परिसरातील जागृत नागरिकानी याची माहिती दिली.
स्फोटांचे आवाज
काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. आगीदरम्यान दोन-तीन वेळा स्फोटही झाल्याचे काही प्रत्यक्षदर्शिनी सांगितले. आतील सिलिंडर, फ्रिज वा मोठे फ्रिजरमधील उपकारणाचे हे स्फोट असावे असा प्राथमिक अंदाज आहे.सुदैवाने राधे कोल्ड्रिंक्स पासून जळगाव पोलीस ठाणे जवळच आहे. यामुळे जळगाव जामोद पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जळगाव नगरपरिषदेचेच्या अग्निशमन दलाला पाचरण केले. मात्र, आलेल्या टँकरमध्ये पाणी कमी असल्यामुळे आग विझवायला विलंब लागला . त्यामुळे नागरिकांत संतप्त प्रतिक्रिया उमटली.
बुलढाणा : जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील आणि मध्यप्रदेश राज्याच्या सीमेला लागून असलेल्या जळगाव नगरीची आजची सकाळ भीषण आगीच्या बातमीने उजाडली! एका दुकानाला लागलेल्या आगीत लाखोंची हानी झाली असली तरी सकाळची वेळ असल्याने सुदैवाने प्राणहानी टळाली.https://t.co/2jrmCKw8Ui#viralvideo… pic.twitter.com/jpLb6pc5bY
— LoksattaLive (@LoksattaLive) May 12, 2025
त्यानंतर शेगाव येथील नगर परिषदेचे अग्निशमन दलाला जळगाव मध्ये पाचरण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केल्यावर पावणे दोन तासा नंतर कुठे ही भीषण आग नियंत्रणात आली. या आगीमुळे लाखोंची नासाडी झाली आणि संपूर्ण दुकान जळून खाक झाले.
मात्र सकाळची वेळ असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच वेगवान वारे नसल्याने नसल्याने आग इतर दुकाना पर्यँत पसरली नाही. यामुळे भीषण अनर्थ टळला. संपूर्ण दुकानच बेचिराख झाल्याने लाखोंची वित्त हानी झाली आहे. मात्र नेमकी किती हानी झाली याची माहिती मिळू शकली नाही. आगीची बातमी पसरताच बाबासाहेब आंबेडकर चौकात बघ्यांची एकच गर्दी उसळली.