नागपूर : आंतरराष्ट्रीय दर्जाची संगीतमय कारंजी फुटाळा तलावावर बनवण्यात आली असून त्याची चाचणी सुरू आहे. या कारंजांसोबत नागपूर शहराचा इतिहास सांगण्यात येत असून त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मदीक्षेचा इतिहास चुकीचा असल्याचा बसपने म्हटले असून नवा वाद निर्माण झाला आहे.खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने फुटाळा येथे संगीतमय कारंजी प्रकल्पाचा ‘ट्रायल शो’ सुरू आहे. त्यात नागपूरबाबत व बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेबाबत चुकीची माहिती सांगितली जात आहे, असा दावा बसपने केला आहे. तसेच त्यात तातडीने सुधारणा करण्याची विनंती नासुप्रकडे केली आहे.

नागपूर फुटाळा तलावावर १५ सप्टेंबरपासून सुरू असलेल्या ‘लाईट व म्युझिकल फाऊंटेन ट्रायल शो’मध्ये अभिनेते अमिताभ बच्चन, गीतकार गुलजार, अभिनेते नाना पाटेकर यांचे समालोचन आहे. कारंज्यावर नागपूरचा इतिहास कथन केल्या जात आहे. यामध्ये ज्यांचा नागपूरशी फारसा संबंध नाही अशा अनेक व्यक्ती व घटनांचा उल्लेखही करण्यात आला. परंतु राजर्षी छत्रपती शाहू राजे हे ३०, ३१ मे व १ जून १९२० रोजी अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषदेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत नागपुरात उपस्थित होते. त्याचा उल्लेख मात्र हेतूत: टाळण्यात आला.

१९४२ ला बाबासाहेबांच्या उपस्थितीत नागपुरातील प्रथम व सर्वात मोठी महिला परिषद आयोजित करण्यात आली. त्याचवेळी स्थापन ‘एसएसडी’ झाली आणि त्याचे संमेलन झाले होते, त्याचा साधा उल्लेखही कारंजावर सांगण्यात येत असलेल्या इतिहासात नाही, असेही बसपाचे उत्तम शेवडे म्हणाले. नासुप्रचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी म्हणाले की हा विषय छाननी समिती समोर मांडण्यात येणार असून याबाबतचा अंतिम निर्णय छाननी समिती घेईल.

हेही वाचा : खोट्या देयकाच्या आधारे कोट्यवधींची करचोरी, नागपूरच्या व्यापाऱ्याला अटक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ ला नागपुरात दिलेल्या धम्मदीक्षेत पाच ते सहा लाख नागरिकांनी दीक्षा घेतल्याचा ‘प्रबुद्ध भारत’ सहित अनेक ठिकाणी संदर्भ उपलब्ध आहे. पण, ‘लाईट व म्युझिकल फाऊंटेन ट्रायल शो’मध्ये तीन लाख ८० हजार लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्याचे सांगण्यात येत आहे. हा आकडा चुकीचा आहे.

हेही वाचा : नागपूर : बेवडा म्हटल्यामुळे युवकाचा दगडाने ठेचून खून

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. आंबेडकर यांनी धम्मदीक्षेप्रसंगी केलेल्या भाषणात नागपूरचा इतिहास, नागा लोकांचे शहर वगैरे व धम्मदीक्षेसाठी नागपूरच का निवडले याबाबत सविस्तर सांगितले होते. त्याचे सविस्तर वृत्तांत २७ ऑक्टोबर १९५६ च्या ‘प्रबुद्ध भारत’च्या आंबेडकर बौद्ध दीक्षा विशेषांकांमध्ये उपलब्ध आहे. मात्र, ‘फाऊंटेन शो’मध्ये जाणीवपूर्णक चुकीचा इतिहास सांगितला जात असल्याचा आरोप बसप नेते उत्तम शेवडे व संदीप मेश्राम यांनी केला आहे.