नागपूर : महाराष्ट्रात कटकारस्थान करून सत्तेत आलेले शिंदे फडणवीस सरकार कायदा सुव्यवस्था राखण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. गुन्हेगारांचे मनोबल वाढले असून पोलीस कारवाई करण्यात अपयशी ठरत आहेत. फडणवीस गृहमंत्री असतानाच धर्मांध शक्तींना प्रोत्साहन कसे मिळत आहे? असा सवाल कॉंगेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात केला आहे.

राज्यात दंगली घडवण्याचा पहिला प्रयत्न मागील महिन्यात फसल्यानंतर आता पुन्हा औरंगजेबाचा मुद्दा पुढे करून वातावरण अशांत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचसोबत मुंबईसारख्या सुरक्षित शहरामध्ये एका विद्यार्थिनीची वसतिगृहात अत्याचार करून हत्या केल्याचे समोर आले आहे. राज्यात पोलिसांचे नाही तर समाजकंटकाचे आणि गुन्हेगाराचे राज्य आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे गृहखात्यावर आणि पोलिसांवर नियंत्रण राहिलेले नाही, त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांचा राजीनामा द्यावा, अशी मागणी पटोले यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

हेही वाचा – नागपूर : टोमणे मारणाऱ्या सासूचा सुनेने केला खून; लुटमार करून खून झाल्याचा बनाव

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सरकारच्या काळात औरंगजेबाचे उदात्तीकरण सुरू आहे. असे करणारे आत्ताच बिळातून बाहेर कसे आले? राज्यात रोज दंगली सुरू आहेत. मुख्यमंत्री व गृहमंत्री काय करत आहेत? शिंदे फडणवीस सरकार नपुंसक आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते ते खरेच आहे. संभाजीनगर, अहमदनगर, शेवगाव, अमरावती, नाशिकमध्ये धार्मिक मुद्द्यांना हवा देऊन राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न मागील महिन्यात झाला, पण लोकांनी सामंजस्याची भूमिका घेतल्याने तो प्रयत्न फसला. आता पुन्हा धर्मांध शक्ती अहमदनगर व कोल्हापूर जिल्ह्यात औरंगजेबाचा मुद्दा पुढे करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलीस खात्याचा वचक असेल तर गुन्हेगारांची अशी हिम्मत होणार नाही. राज्यात धार्मिक मुद्द्यांना हवा देऊन दंगली भडकावून आपली राजकीय पोळी शेकणे हा भाजपाचा कुटील डाव आहे. त्यामुळे फडणवीस जाणीवपूर्व अशा घटनांकडे दुर्लक्ष करत आहेत का? असा प्रश्न पटोले यांनी केला आहे.