नागपूर : आमदार बच्‍चू कडू हे सत्‍तारूढ आघाडीत असले, तरी अनेकवेळा सरकारवर टीका करतात. त्यांचे वक्तव्य नेहमी चर्चेत राहते. मंगळवारी विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी मी २०२४ मध्ये मुख्यमंत्री होणार, असे वक्तव्य केले. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेल्या एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांचे टेंशन वाढण्याची शक्यता आहे.

सत्ताधारी पक्षाचे आमदार व दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष बच्चू कडू म्हणाले, माझे सात ते आठ आमदार निवडून आल्यास मी मुख्यमंत्री होऊ शकतो. देशात एच. डी. देवेगौडा यांच्याकडे केवळ ८ खासदार असताना ते पंतप्रधान झाले होते. तेव्हा मीही निश्चितच मुख्यमंत्री होऊ शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी विधानभवन परिसरात मंगळवारी पत्रकारांशी बोलताना अजित दादांना २०२४ मध्ये मुख्यमंत्री करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते. त्यावर पत्रकारांनी बच्चू कडू यांना विचारल्यावर कडू यांनी हे उत्तर दिले.

हेही वाचा : बालके अनौपचारिक शिक्षण, पोषण आहारला महिनाभर मुकणार; सरकार-कर्मचारी संघटनांची चर्चा फिस्कटली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बच्चू कडू पुढे म्हणाले, अनाथालयातून बाहेर निघाल्यानंतर मुलींची व्यवस्था व्हावी, तिला उदरनिर्वाहाचे मार्गदर्शन मिळावे याकरिता सरकारने पावले उचलण्याची गरज आहे. या मुलींचा प्रश्न मोठा आहे आणि जिथपर्यंत राहण्याची व्यवस्था होत नाही तोपर्यंत तिची सर्व व्यवस्था सरकारने केली पाहिजे. २० वर्षापर्यंत मुलीला अनाथालयात ठेवले जाते. पण, २१ व्या वर्षी जेव्हा ती मुलगी बाहेर पडते, तेव्हा तिच्याकडे घरही नसते. या मुलीला नातेवाईक, जात, धर्म, पंथ नसतो. तिच्या राहण्याची अवस्था झाली पाहिजे. यासाठी आम्ही हा प्रश्न उपस्थित केला होता. पण, याबाबत मंत्र्यांकडून आम्हाला कोणतेही उत्तर मिळाले नाही. यावरून त्यांच्या मनात अनाथ मुलींबद्दल किती अनास्था आहे हे समोर आल्याची टीकाही बच्चू कडू यांनी केली.