नागपूर : दुष्काळी परिस्थितीत सरकारकडून कर्ज मिळवून देण्याच्या नावावर जिल्ह्यातील १५१ शेतकऱ्यांची ११३ कोटींनी फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी १८ पेक्षा जास्त जणांविरुद्ध मौदा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपी रमण्णाराव मुसलिया बोल्ला, वीर व्यंकटराव सत्यनारायण वाकलकुडी, आनंद काकडे, व्यंकटराव गेडा या चौघांना अटक करण्यात आली तर अन्य १६ जण फरार आहेत.

कोट्यधीश असलेला मुख्य आरोपी रामण्णाराव बोल्ला हा मौदा येथील भात गिरणीचा मालक आहे. तो अनेक शेतकऱ्यांना व्याजाने पैसे देतो. त्याने २०१७ मध्ये १५१ शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचे आश्वासन दिले व शेतकऱ्यांच्या नावावर बँकेतून कोट्यवधीच्या कर्जाची उचल केली. यासाठी महिंद्रा मुप्पू वारको, कॉर्पोरेशन बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक मन्शुराम पाटील, संदीप जगनाडे, पत्नी विजयलक्ष्मी बोल्ला आणि भाऊ त्रिपतराव बोल्ला व एनसीएमएल कंपनीचे तत्कालीन अधिकारी यांना विश्वासात घेतले. जवळपास १५० कोटींनी फसवणूक करण्याची योजना आखण्यात आली. या फसवणुकीत बँकेचे व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाची होती.

रमण्णाराव बोल्ला, वीर व्यंकटराव सत्यनारायण वाकलकुडी, महिंद्रा मुप्पू वारको, कॉर्पोरेशन बँकेचे व्यवस्थापक मन्शुराम पाटील, संदीप जगनाडे व एनसीएमएल कंपनीचे तत्कालीन अधिकारी, रमण्णा बोला यांच्या विविध १२ कंपन्यांचे संचालक व अन्य, अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. फसवणूक झालेले शेतकरी मौदा, पारशिवनी व रामटेक तालुक्यातील आहेत. शेतकऱ्यांना धान्य गहाण ठेवल्याचा मोबदल्यात बँकेकडून कर्ज देण्यात येते. २०१७ मध्ये जिल्ह्यात ओला दुष्काळ पडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले. बोल्ला याने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळत असल्याचे सांगितले व १५१ शेतकऱ्यांना सदरमधील कॉर्पोरेशन बँकेत आणले. तेथे त्यांच्याकडून आधारकार्ड व पॅनकार्ड घेतले. त्यांचे खाते उघडले. बँकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून धनादेश मिळवले. त्यावर १५१ शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन धनादेश स्वत:जवळ ठेवले. त्यानंतर बोल्ला व त्याच्या साथीदारांनी बनावट दस्तऐवजाद्वारे धान्याच्या मोबदल्यात कर्ज मिळवण्यासाठी बँकेत अर्ज केला. त्याआधारे तत्काळ शेतकऱ्यांना कर्ज मंजूर करण्यात आले. धनादेशाद्वारे विविध २४ खात्यांमध्ये कर्जाची रक्कम वळती करून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली.

हेही वाचा… सना खान हत्याकांड प्रकरणात आरोपपत्र दाखल, पोलिसांचे काय आहेत दावे?

शेतकऱ्यांना नोटीस आल्यावर फसवणूक उघड

ऑगस्ट २०२३ मध्ये बँकेकडून वसुलीसाठी अनेक शेतकऱ्यांना नोटीस पाठवण्यात आल्या. कर्ज घेतले नसतानाही नोटीस आल्याने शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली. शेतकऱ्यांनी बोल्लाची भेट घेतली. नोटीसबाबत विचारणा केली तेव्हा त्याने ‘तुमच्या नावे घेतलेल्या कर्जाची रक्कम मी १२ कंपन्यांमध्ये जमा केली आहे. तुम्हाला व्याजासह काही दिवसांनी पैसे परत करतो,’ असे सांगितले. मात्र, त्याने शेतकऱ्यांना रक्कम दिली नाही.

हेही वाचा… शेगाव नगरीतील उच्चभ्रू वस्तीत आढळले नवजात अर्भक

शेती नाही, तरीही काढले कर्ज

फसवणूक झालेल्यांपैकी सहा जण शेतमजूर आहेत. त्यांच्याकडे शेती नाही. मात्र, बोल्ला व त्याच्या साथीदारांनी त्या सहा मजुरांना शेतकरी असल्याचे दाखवले. बनावट दस्तऐवज व सातबारा तयार करून या सहा जणांच्याही नावे कर्ज घेतले.

हेही वाचा… अकोला : शिवसेना ठाकरे गटाला तोडफोड करणे भोवले, जिल्हा प्रमुखासह शिवसैनिकांवर गुन्हा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निवडणुकीसाठी पक्षाला मदत

मुख्य आरोपी रामण्णाराव बोल्ला हा कोट्यधीश असून तो एका राष्ट्रीय पक्षाशी जुळलेला आहे. त्याने निवडणुकीदरम्यान पक्षाला मदत केली. त्यामुळे बोल्लासह अन्य काही आरोपींना एका बड्या नेत्याचा आशीर्वाद असल्याची चर्चा आहे. बड्या नेत्याच्या हस्तक्षेपांमुळेच अन्य आरोपींना अभय मिळाल्याचे बोलले जाते.