लोकसत्ता टीम

नागपूर: राज्यात हवामान बदलाच्या पर्वाला सुरुवात झाली आहे. अवकाळी पावसाने माघार घेतली असून सुर्यनारायणाने तेवढ्याच दमदारपणे पावले टाकण्यास सुरवात केली आहे. तापमान वाढीचा पारा राज्यात झपाट्याने वर जात असून ४४ अंश सेल्सिअसचा टप्पा त्याने पार केला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील चार दिवस उष्णतेची लाट कायम असणार आहे. दिवसागणिक उन्हाची तीव्रता वाढणार असून उन्हाच्या झळा मात्र नागरिकांना सोसाव्या लागणार आहेत. या आठवड्याची अखेर व पुढील आठवड्याची सुरुवात उष्णतेच्या लाटेसह होणार आहे. शुक्रवारी अकोल्यातील तापमानाने ४४ अंश सेल्सिअसचा टप्पा पार केला होता. तर इतर शहरात देखील तापमान ४१ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक होते.

हेही वाचा… प्रवाशांसाठी आनंदवार्ता! मुंबईकरिता एयर इंडियाचे आणखी एक विमान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विदर्भाला या तापमानाची सवय असली तरीही मुंबई, पुणे या शहरांमध्ये अलीकडच्या कालावधीत तापमान वाढ होऊ लागली आहे. मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रामध्ये उन्हाचा तडाखा वाढण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणांनी देखील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे