नागपूर : अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यांना नुकसानभरपाई म्हणून देण्यात आलेली रक्कम ही अक्षरश: तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे, अशी टीका करत महाविकास आघाडीच्या आमदारांनी मंगळवारी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. आंदोलनादरम्यान विरोधकांनी “शेतकरीविरोधी सरकारचा धिक्कार असो,” आणि कायदा सुव्यवस्थेवर घोषणा दिल्या.

राज्यातील शेतकऱ्यांवर ओढवलेल्या आसमानी संकटावर सभागृहात चर्चा झाली. त्यावर सोमवारी सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर देत शेतकऱ्यांना नुकसानभरपाई जाहीर केली. मात्र, ही नुकसानभरपाई पुरेशी नसल्याची टीका करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. ‘महाराष्ट्र शिव- शाहू- फुले- आंबेडकरांचा की दहशतखोरांचा’, ‘इक्बाल मिर्चीसोबत कुणाचे व्यवहार’, कोणता मंत्री ड्रग्ज माफियाचा साथीदार’, ‘महिला असुरक्षित तरुण बेरोजगार, झोपा काढतंय हे ट्रिपल इंजिन सरकार’ असे फलक हातात घेऊन विरोधकांनी आंदोलन केले. आंदोलनात विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अमित देशमुख, प्रणिती शिंदे, सतेज पाटील, रवींद्र वायकर, रवींद्र धंगेकर आदींची उपस्थिती होती. यावेळी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दादेखील उपस्थित करण्यात आला.

हेही वाचा : “विदर्भातील समस्यांवर चर्चा करण्यासाठी हिवाळी अधिवेशन दोन दिवसांनी वाढवा”, नाना पटोले म्हणतात…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दहशतवादाच्या मुद्यावर भाजपा दुटप्पी भूमिका

भाजपा दहशतवादाच्या मुद्यावर दुटप्पी भूमिका घेत आहे. आम्ही पुरावे देऊनही त्याची दखल घेत नाही. मात्र, त्यांच्या आमदारांनी माहिती देताच ते चौकशी लावतात. या भूमिकेच्या विरोधात आम्ही आंदोलन करीत आहो, असे अंबादास दानवे यांनी सांगितले.