अमरावती‎ : बडनेरा येथील मैदानावर मॉं कनकेश्‍वरी देवी जनकल्‍याण ट्रस्‍टतर्फे आयोजित रामचरित मानस कथागंगा संमेलनात कनकेश्‍वरी देवी यांची ग्रामगीतेने तुला करण्‍याच्‍या प्रकारानंतर वाद उफाळून आला असून या घटनेबद्दल राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्‍या अनुयायांनी निषेध व्‍यक्‍त केला आहे. 

बडनेरा येथे कनकेश्वरी देवी यांची तुला ग्रामगीतेने करण्याचा अतिशय संतापजनक प्रकार कथा आयोजकांनी केला, याचा निषेध सर्व स्तरातून करणे आवश्यक आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता म्हणजे युगग्रंथ आहे. ती आजच्या युगाची संजीवनी बुटी आम्ही मानतो, असे राष्ट्रसंत म्हणत. आजवर आपण रक्ततुला, लाडूतुला पाहिली परंतु ‘ग्रामगीता तुला’ पहिल्यांदा बघितली. जगाचा तोल सावरण्यासाठी ज्या ग्रामगीता ग्रंथाची रचना झाली तिचा कुणाला तोलण्यासाठी उपयोग व्हावा, ही बाब गांभीर्याने सर्वांनी लक्षात घेऊन या गोष्टीचा सर्व स्तरातून निषेधच केला पाहिजे, असे परखड मत अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळाचे माजी उपसर्वाधिकारी रुपराव वाघ यांनी क्‍यक्‍त केले आहे.

हेही वाचा >>> धक्कादायक! ‌अल्पवयीन मुलीने ‘यू-ट्यूब’वर बघून स्वत:चीच केली प्रसूती, त्यानंतर बाळाला…

ज्या ज्ञानवंत व्यक्तीची तुला करण्यात आली त्यांनी तर ही गोष्ट मान्य करायलाच नको होती. कधी कधी ज्ञानी ल़ोकांनाही याचे भान राहू नये याचे आश्चर्य वाटते. आयोजकांकडून झालेल्या चुकांमुळे असा मनस्ताप अशा मान्‍यवर लोकांनाही सहन करावा लागतो. सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या गोष्‍टीचा निषेध करायला पाहिजे. ग्रामगीतेची अशा प्रकारची विटंबना मान्य आहे का? नसेल तर त्यांची भूमिका याबाबत काय आहे हे सुद्धा त्यांनी जाहीर केले पाहिजे.

हेही वाचा >>> सराफा व्यापारी पोहोचले पटोलेंच्या घरी, स्वीय सहाय्यकाची केली तक्रार

उद्या भविष्यात आपण रामायण, भगवद् गीतेचीही तुला कराल काय?, असा प्रश्‍न रुपराव वाघ यांनी उपस्थित केला आहे. ‘अपना ग्राम ही तीर्थ बनाओं’ अभियानाच्‍या वतीने झालेल्‍या प्रकाराचा निषेध व्‍यक्‍त करण्‍यात आल्‍याचे रुपराव वाघ यांनी म्‍हटले आहे. कनकेश्‍वरी देवी यांचे प्रवचन गेल्‍या २५ फेब्रुवारीपासून आयोजित करण्‍यात आले होते. २ मार्चला त्‍यांची रुद्राक्ष, सफरचंद, मोतीचूरचे लाडू, गुळ यांच्‍यासोबतच राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराजांच्‍या ग्रामगीतेने तुला करण्‍यात आली. यावरूनच वाद उफाळून आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपमुख्‍यमंत्र्यांची रामकथेला हजेरी

बडनेरा येथील या कार्यक्रमाला रविवारी उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हजेरी लावली होती. माँ कनकेश्वरी व रामायणाचे दर्शन घेण्याचे भाग्य आज लाभले, अशी भावना उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी काही वेळ कार्यक्रमस्थळी थांबून रामकथेचे श्रवण केले.