नागपूर : महामेट्रोचा प्रकल्प उभारण्याइतकेच प्रकल्प पूर्ण झाल्यावर त्याचे दीर्घकाळापर्यंत संचालन करणे हे आव्हानात्मक काम आहे. सध्या मेट्रोतून दररोज ८० हजार प्रवासी प्रवास करीत आहे. मेट्रोची ‘कनेक्टिव्हीटी’ वाढवण्यात आम्ही कमी पडलो, ही संख्या दोन लाखांवर नेण्याचे आमचे प्रयत्न आहे, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डिकर यांनी सांगितले.

व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रथमच हर्डिकर यांनी माध्यमांशी अनौपचारिक चर्चा केली. मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या कमी का, असा प्रश्न त्यांना विचारला असता ते म्हणाले, सहा महिन्यापूर्वी प्रवासी संख्या ५६ हजारापर्यंत कमी झाली होती. आता ती पुन्हा ८० हजारांवर गेली आहे. प्रवासी संख्या कमी होण्यामागे वाढलेले तिकीट दर हे प्रमुख कारण असले तरी जास्तीत जास्त लोकांना मेट्रोशी जोडण्यात (कनेक्टिव्हीटी) आम्ही कमी पडलो. लोकांची मेट्रो स्थानकापर्यंत पायदळ न जाणे ही सवय देखील यासाठी कारणीभूत आहे. स्थानकाजवळील वस्त्यांना फीडर सेवा उपलब्ध करून देण्यावर आम्ही भर दिला आहे. टप्प्याटप्प्याने ही संख्या दोन लाखांवर नेण्याचा आमचा प्रयत्न असेल.

हेही वाचा >>>खळबळजनक! युवती सेनेच्या शहर प्रमुख पत्नीची पतीने केली चाकू भोसकून हत्या

महापालिकेचा आयुक्त असताना नागपूरची बस सेवा अधिक सक्षम करण्याचे प्रयत्न केले होते. मेट्रो आणि बस यांच्यात स्पर्धा निर्माण न करता दोन्ही व्यवस्था परस्परांना पूरक करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. पुण्यात हा प्रयोग यशस्वी झाला. नागपूरमध्येही आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले. शाळा, महाविद्यालय, एमआयडीसी, बाजारपेठा, रेल्वे, बसस्थानके यासह विविध वस्त्यांमधून नागरिकांना मेट्रो स्थानकापर्यंत नेण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत, असे त्यांनी सांगितले. देशातील कोणतीही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही फायद्यात नाही. दिल्ली मेट्रोचा संचालन खर्च व त्यातून मिळणारे उत्पन्न २५ वर्षानंतर ना नफा-ना तोटा पातळीवर आली आहे. जेव्हा संचालन आणि अन्य मार्गाने येणारे उत्पन्न वाढेल व कर्जाचा हप्ता फेडण्याची क्षमता मेट्रोची निर्माण होईल तेव्हाच प्रकल्प फायद्यात असल्याचे म्हणता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मेट्रोमध्ये नोकर भरतीत आरक्षण नियम पाळण्यात येईल. यापूर्वी काही तसे झाले नसेल तर त्याची माहिती घेतली जाईल. नागपुरात मेट्रो कोच तयार करण्याचा कारखाना सुरू करण्याचा कोणताही विचार नाही, असेही ते म्हणाले.

हेही वाचा >>>यवतमाळ: पाच लाखांच्या खंडणीसाठी डोक्याला बंदूक लावली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुरक्षा आयुक्तांकडून तपासणी

प्रवासी सेवा सुरू झाल्यानंतर मेट्रो सुरक्षा आयुक्तांकडून गुरुवारी कॉटन मार्केट स्थानकावर सुरक्षा तपासणी करण्यात आली. यापूर्वी त्यांनी ही तपासणी केली होती. प्राथमिक तपासणी प्रमाणपत्रानंतरच त्या मार्गावरून प्रवासी सेवा सुरू झाली. आता त्यांनी पुन्हा तपासणी केली आहे, असे त्यांनी सांगितले.