नागपूर : भारतीय पोलीस सेवेतील ज्येष्ठ अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या विरोधातील फोन टॅपिंगच्या गुन्ह्याचा तपास बंद करण्याबाबत न्यायालयात सादर करण्यात आलेल्या अहवालाचे तीव्र पडसाद गुरुवारी विधानसभेत उमटले.
हा अहवाल न्यायालयाने फेटाळलून लावला असला तरीही यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा थेट संबंध असल्याचा आणि याप्रकरणातील खरा सूत्राधार उघड होऊ नये यासाठी सरकार शुक्ला यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप विधानसभेत गुरुवारी विरोधकांनी केला. तसेच अध्यक्षही सरकारला पाठिशी घालत असल्याचा आरोप करीत विरोधकांनी सभात्याग केला.
महाविकास आघाडी सरकारमधील राजकीय नेत्यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास बंद करण्यात येत असल्याबाबत पुणे पोलिसांनी न्यायालयात अहवाल सादर केला होता. मात्र हा अहवाल न्यायालयाने फेटाळून लावत काही मुद्दय़ांवर तपास करण्याचे आदेश पुणे पोलिसांना दिले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशीष देशमुख यांचे फोन टॅप केल्याचा शुक्ला यांच्यावर आरोप आहे.
विधानसभेत कामकाज सुरू होताच नाना पटोले यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पटोले यांची मागणी फेटाळली. त्यावर पटोले यांनी सरकार राजकीय नेत्यांना ब्लॅकमेल करणाऱ्या अधिकाऱ्यांना सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप केला. तसेच या प्रकरणाशी उपमुख्यमंत्र्यांचा थेट संबंध असल्याचा हल्ला चढविला. आपण या प्रकरणातील पिडीत असूनही विरोधकांचा आवाज दाबला जात असल्याचा आरोप पटोले यांनी केला.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही सरकारवर हल्ला चढविताना रश्मी शुक्ला यांनी भाजप सरकारच्या कालावधीत विधिमंडळातील सदस्यांसह अनेक मान्यवरांचे फोन बेकायदेशीरपणे टॅपिंग केल्याचा आरोप केला. यामुळे विधिमंडळाच्या सदस्यांच्या स्वातंत्र्याचा संकोच झाला असून लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. या फोन टॅपिंग प्रकरणाचा सूत्रधार कोण आहे , कोणाच्या आदेशाने हे फोन टॅपिंग करण्यात आले , आता रश्मी शुक्ला यांना वाचविण्याचा कोण प्रयत्न करत आहे , ही माहिती सभागृहाच्या समोर आणण्याची मागणीही पवार यांनी केली.
आमचे सरकार असताना आम्ही कुणाचा फोन टॅप केला नव्हता. पण कारण नसताना राज्यातील नेत्यांचे फोन टॅप करण्यात आले, असे अजित पवार यांनी सांगितले.