नागपूर : उपराजधानीतील एका निर्दयी पित्याने त्याच्या दोन्ही मुलांना संक्रांतीला तिळगूळ ऐवजी विष देऊन ठार करण्याचा प्रयत्न केला. २ पैकी मुलीचा मृत्यू झाला असून मुलगा अत्यवस्थ आहे. या घटनेनंतर बापानेही गळफास घेऊन आत्महत्या केली.

नागपुरातील वाठोडा पोलीस ठाण्याअंतर्गत ही घटना घडली. मनोज अशोक बेले (४५) असे निर्दयी बापाचे नाव आहे. मनोजचा गेल्या वर्षभरापासून पत्नी प्रिया हिच्यासोबत वाद सुरू होता. त्यामुळे दोघेही वेगवेगळे राहत होते. सात वर्षीय तनिष्का व १२ वर्षीय प्रिन्स ही दोन्ही मुले आई प्रियासोबत विद्यानगर, कांबळे यांच्या घरी भाड्याने राहत होते. तर मनोज हा वाठोड्यातील नागोबा गल्ली येथे राहत होता. पती-पत्नीने आपापसात केलेल्या करारानुसार तनिष्का व प्रिन्स ही दोन्ही मुले दर रविवारी वडिलांकडे जायचे.

हेही वाचा >>> अकोला : बोरं देण्याच्या बहाण्याने नराधमाचा अल्पवयीन मुलावर अत्याचार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी आजोबांनी दोघांना मनोजच्या घरी सोडले. मनोजने मुलांना खाऊपिऊ घातले व जेवणात विष टाकले. शिवाय त्यांचा दोरीने गळा आवळण्याचादेखील प्रयत्न केला. दोघांचीही प्रकृती खराब झाल्याने त्यांना उपचारासाठी भरती करण्यात आले. त्यात तनिष्काचा मृत्यू झाला, तर प्रिन्सवर मेडिकल इस्पितळात उपचार सुरू आहेत. यानंतर मनोजने स्वत:च्याच घरी लाकडी बल्लीला गळफास घेऊन आत्महत्या केली. वाठोडा पोलिसांनी मृत मनोजविरोधात गुन्हा नोंदवला असून तपास सुरू आहे.